बायोटेक्नॉलॉजी क्षेत्रातील यशस्वी उद्योजिका
आजच्या काळात स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात उत्तम कामगिरी करताना दिसत आहेत. अगदी चारचाकी चालवण्यापासून विमान उडवण्यापर्यंत आणि अंतराळात जाण्यापासून विज्ञान क्षेत्रापर्यंत महिलांनी उंच भरारी घेतली आहे. अशीच एक यशस्वी स्त्री म्हणजे भारताच्या बायोटेक क्षेत्रात मोठी क्रांती घडवणाऱ्या उद्योजिका किरण मझुमदार- शॉ.
किरण मझुमदार-शॉ या एक भारतीय अब्जाधीश उद्योजिका आणि बायोकॉन लिमिटेड या बायोटेक्नॉलॉजी कंपनीच्या संस्थापिका आहेत. त्या बायोकॉन बायोलॉजिक्स लिमिटेडच्या अध्यक्षा आणि बेंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या माजी अध्यक्षा आहेत.
किरण यांचा जन्म २३ मार्च १९५३ रोजी कर्नाटकात बेंगळुरूमध्ये झाला. माउंट कॅमल कॉलेजमधून त्यांनी झूलॉजीमध्ये बीएस्सी पदवी घेतली. त्यानंतर मेलबर्नमधून ब्रूइंग टेक्नॉलॉजीमध्ये त्यांनी डिप्लोमा केला. त्यांचे वडील रुस्टीम इराणी मझुमदार हे युनियन कार्बाइड कंपनीमध्ये मुख्य ब्रू-मास्टर होते. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्या भारताच्या पहिल्या महिला ब्रू-मास्टर बनल्या. शिक्षणानंतर त्यांनी बराच काळ भारतात नोकरी शोधली; पण एक महिला ब्रू-मास्टर म्हणून कोणतीही भारतीय कंपनी त्यांना संधी देण्यास तयार होत नव्हती. अखेर त्यांनी आपला मोर्चा परदेशाकडे वळवला आणि काम मिळवले. किरण यांनी १९७८ मध्ये बेंगळुरूत एका छोट्याशा गॅरेजमध्ये फक्त दहा हजार रुपयांच्या माफक भांडवलातून बायोकॉनची स्थापना केली. बायोकॉन ही देशातील पहिली जैव तंत्रज्ञानावर आधारित कंपनी होती. ती एन्झाइम्स आणि औषधे तयार करायची. सुरुवातीला त्यांनी आयर्लंडमध्ये बायोकॉन बायोकेमिकल्स लिमिटेड या कंपनीसोबत पार्टनरशिपमध्ये काम केले. यानंतर आजच्या घडीला बायोकॉन ही देशातील अग्रगण्य बायोटेक कंपन्यांपैकी एक आहे. ती इन्सुलिन, बायोफार्मा प्रॉडक्ट्स, जेनेरिक औषधांची निर्मिती करते. त्यामुळे बायोकॉनला जागतिक बाजारपेठेत एक विशेष स्थान आहे.
लग्नानंतर पतीच्या मदतीने त्यांनी बायोकॉनच्या माध्यमातून आणखी क्रांती घडवली. सामान्य कुटुंबातील असूनही त्यांनी विज्ञान आणि उद्योग क्षेत्रात यशाचे शिखर गाठले. विशेष म्हणजे केवळ व्यावसायिक कौशल्यासाठी नव्हे, तर जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील नेतृत्वासाठीदेखील त्यांना ओळखले जाते. परोपकारी स्वभावामुळे त्या आरोग्यसेवादेखील करतात. विज्ञान, व्यवसाय आणि आरोग्यसेवेतील योगदानासाठी आजवर त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
१९८९मध्ये भारत सरकारकडून त्यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच २०० मध्ये पद्मभूषण पुरस्कारानेही त्यांचा गौरव करण्यात आला. याशिवाय फोर्ब्ज, टाइम यांसारख्या जागतिक प्रकाशनांनी त्यांना जगातील प्रभावशाली महिलांमध्ये स्थान दिले आहे. इतकेच नव्हे, तर त्यांना अनेक युनिव्हर्सिटीजच्या सन्माननीय डॉक्टरेट्स मिळाल्या असून, अनेक वैज्ञानिक संस्था व उद्योग क्षेत्रातील सल्लागार समित्यांवर सदस्य म्हणूनही त्या कार्यरत आहेत.
(संकलित)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment