परदेशात राहणाऱ्या भारतीय समुदायाचे भारताच्या विकासामध्ये असलेले योगदान अधोरेखित करणे, हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.
भारतात दर वर्षी नऊ जानेवारी हा प्रवासी भारतीय दिन म्हणून साजरा केला जातो. परदेशात राहणाऱ्या भारतीय समुदायाचे भारताच्या विकासामध्ये असलेले योगदान अधोरेखित करणे, हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. भारतीय, मग ते देशात राहणारे असोत वा कामानिमित्त परदेशात राहणारे असोत, त्यांचे देशाच्या प्रगतीत असलेले योगदान तितकेच महत्त्वाचे आहे. भारतीय संस्कृतीत सर्वांप्रति कृतज्ञतेची भावना ठेवली जाते. या दिवसाला एक ऐतिहासिक महत्त्वसुद्धा आहे.
नऊ जानेवारी १९१५ रोजी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेहून भारतात परतले होते. गांधीजींच्या या आगमनाचे आणि त्यांच्या भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचे स्मरण म्हणून हा दिवस निवडण्यात आला आहे. या दिवसाची सुरुवात २००३मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात झाली. २०१५पासून हा कार्यक्रम दर दोन वर्षांनी मोठ्या प्रमाणावर आयोजित केला जातो.
१८व्या प्रवासी भारतीय दिन अधिवेशनाचे आयोजन ८ ते १० जानेवारी २०२५ या कालावधीत भुवनेश्वर (उडीशा) येथे करण्यात आले होते. २०२५च्या अधिवेशनाचा विषय 'विकसित भारतासाठी डायस्पोराचे योगदान' असा होता . या अधिवेशनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. परदेशात राहून भारताची मान उंचावणाऱ्या निवडक अनिवासी भारतीयांना भारताचे राष्ट्रपती या दिवशी प्रवासी भारतीय सन्मान देऊन गौरवतात.
(संकलित)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment