सहकार्याचेही दिले आश्वासन
माजलगाव (जि. बीड) : 'लक्ष्यित गटातील घटकांसाठी अमृत संस्था ज्या पद्धतीने सकारात्मक आणि रचनात्मक काम करत आहे, ते अत्यंत प्रेरणादायी आहे,' अशा शब्दांत अभिनेते संदीप पाठक यांनी अमृत संस्थेचे कौतुक केले आहे. ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ या गाजलेल्या नाटकामुळे घराघरात पोहोचलेले महाराष्ट्रातील प्रसिद्ध सिने व नाट्य अभिनेते संदीप पाठक हे मूळचे बीडच्या माजलगाव तालुक्यातील रहिवासी आहेत. नुकतेच ते माजलगाव दौऱ्यावर आले असता अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेचे जालना जिल्हा उपव्यवस्थापक चिंतेश जोशी यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली.
खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या अमृत या संस्थेच्या कार्याची माहिती या भेटीमध्ये पाठक यांना देण्यात आली. अमृत संस्थेची दिनदर्शिकाही त्यांना भेट म्हणून प्रदान करण्यात आली. अमृत संस्थेमार्फत खुल्या प्रवर्गातील समाजासाठी राबविण्यात येणारे विविध सामाजिक, शैक्षणिक, कौशल्य विकास व स्वयंरोजगाराभिमुख उपक्रम यांची माहिती ऐकून अभिनेते संदीप पाठक यांनी समाधान व्यक्त केले.
अमृत संस्था महाराष्ट्रात खुल्या प्रवर्गातील अशा समाजघटकांसाठी काम करते, ज्यांना कोणत्याही अ्य शासकीय महामंडळाचा किंवा स्वतंत्र विकास संस्थेचा लाभ मिळत नाही. ब्राह्मण, मारवाडी, माहेश्वरी, गुजराती, सिंधी, कोमटी यांसारख्या समाजातील युवक-युवतींसाठी कौशल्य प्रशिक्षण, रोजगारनिर्मिती, स्वयंरोजगारासाठी आर्थिक साह्य, उद्योग उभारणीस मार्गदर्शन, तसेच सामाजिक व शैक्षणिक सक्षमीकरणाचे काम अमृत संस्थेमार्फत सातत्याने केले जात आहे.
अमृत संस्थेच्या कामाची ही माहिती ऐकून अभिनेते संदीप पाठक यांनी संस्थेच्या कार्याचे मनापासून कौतुक केले. “लक्ष्यित गटातील घटकांसाठी अमृत संस्था ज्या पद्धतीने सकारात्मक आणि रचनात्मक काम करत आहे, ते अत्यंत प्रेरणादायी आहे. अशा उपक्रमांचा प्रचार व प्रसार होणे गरजेचे आहे. अमृत संस्थेच्या कार्यासाठी मला जेवढी मदत करता येईल तेवढी मी नक्की करीन,” असे आश्वासन त्यांनी या वेळी दिले. अमृत संस्थेला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन त्यांनी समाजासाठी सुरू असलेले हे कार्य अधिक व्यापक स्तरावर पोहोचावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपाल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment