दरवर्षी ७ ऑगस्ट रोजी संपूर्ण भारतात 'राष्ट्रीय हातमाग दिन' साजरा केला जातो. १९०५ मध्ये आजच्याच दिवशी सुरू झालेल्या ऐतिहासिक स्वदेशी चळवळीची आठवण म्हणून २०१५ पासून या दिवसाची सुरुवात झाली.
भारतभरात ७ ऑगस्ट हा दिवस 'राष्ट्रीय हातमाग दिन' (National Handloom Day) म्हणून उत्साहात साजरा केला जातो. ७ ऑगस्ट १९०५ रोजी कोलकाता येथील टाऊन हॉलमध्ये स्वदेशी चळवळीची ऐतिहासिक घोषणा झाली होती. परदेशी वस्तूंचा त्याग करून स्वदेशी कापडाचा स्वीकार करणे हा या चळवळीचा मुख्य भाग होता. या घटनेचे औचित्य साधून २०१५ मध्ये भारत सरकारने ७ ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिन म्हणून घोषित केला. हातमाग क्षेत्र हे भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा कणा असून, शेतीनंतर सर्वाधिक रोजगार देणारे हे मोठे क्षेत्र आहे. महाराष्ट्राची जगप्रसिद्ध पैठणी, सोलापूरची चादर आणि देशातील विविध प्रांतांमधील पारंपरिक वस्त्रे आपली समृद्ध कला दर्शवतात. आजच्या आधुनिक काळात या पारंपरिक कलेचे जतन करणे आणि विणकर बांधवांना योग्य बाजारपेठ मिळवून देणे गरजेचे आहे. स्वदेशी आणि हातमाग उत्पादनांचा दैनंदिन जीवनात वापर वाढवणे हीच या दिवशी विणकरांना दिलेली खरी भेट ठरेल.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment