गीतरामायणाचे शिल्पकार- सुधीर फडके

स्व. सुधीर फडके यांचे नाव जरी आपण ऐकले, तरी आपल्याला आठवते, ते गीत रामायण! या थोर गायक आणि संगीतकाराची आज जयंती आहे,त्यानिमित्त त्यांच्या सांगीतिक प्रवासाचा हा संक्षिप्त आढावा

गीतरामायणाचे शिल्पकार- सुधीर फडके मुख्य फोटो
मुख्य फोटो

‘गदिमां’च्या गीतरामायण या महाकाव्याचे संगीतकार आणि लोकप्रिय गायक स्व. सुधीर फडके यांनी पाच दशके मराठी चित्रपट उद्योग आणि मराठी संगीताची अविरत सेवा केली. त्यांनी या व्यतिरिक्त अनेक हिंदी चित्रपटांमध्येही गाणी गायली आणि संगीतबद्ध केली आहेत, जी आजही आपल्या सर्वांच्या आवडीची गाणी आहेत. प्रसिद्ध मराठी भावगीत गायक आणि चित्रपट क्षेत्रातील निर्माता, संगीत दिग्दर्शक व पार्श्वगायक म्हणून त्यांची कारकीर्द अजरामर आहे.

त्यांचे पूर्ण नाव रामचंद्र ऊर्फ सुधीर विनायकराव फडके होते. पण बाबूजी या नावाने ते सर्वश्रुत होते. २५ जुलै १९१९ रोजी कोल्हापूर येथे त्यांचा जन्म झाला. आई सरस्वतीबाई त्यांच्या बालपणीच निवर्तल्या. वडील विनायकराव वकील होते. बाबूजींचे शालेय शिक्षण कोल्हापुरात झाले. त्यांचे जन्माचे नाव राम होते, परंतु त्यांनी HMV साठी गाणी तयार केल्यावर त्यांचे नाव बदलून ‘सुधीर’ असे ठेवण्यात आले. कोल्हापुरातील दिवंगत वामनराव पाध्ये यांच्याकडून त्यांनी शास्त्रीय संगीताचे प्राथमिक शिक्षण घेतले होते.

सन १९४१ साली HMV मधून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केल्यानंतर, १९४६ मध्ये ते प्रभात फिल्म कंपनीत संगीत दिग्दर्शक म्हणून रुजू झाले. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांना संगीबद्ध केले आहे. कवी ग. दि. माडगूळकर यांच्या श्लोकांवर आधारित ‘गीतरामायण’ ही फडके यांच्या सर्वाधिक लोकप्रिय कृतींपैकी एक आहे. हा कार्यक्रम ऑल इंडिया रेडिओवर एक वर्ष पर्यंत चालला होता. त्यांनी सर्व ५६ गाणी संगीतबद्ध केली आणि ती वेगवेगळ्या गायकांनी रेडिओसाठी गायली आहेत.

बाबूजींनी त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या काही दिवसात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावरील हिंदी चित्रपटाच्या निर्मितीमध्ये आपले योगदान दिले. ‘वीर सावरकर’ या चित्रपटाला सार्वजनिक देणगीतून निधी मिळाला होता. या चित्रपटासाठी सुधीर फडके यांनी शेवटचे गायन आणि संगीत दिले होते. त्याचप्रमाणे गोवा स्वातंत्र्य संग्रामात आणि भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या लढ्यातही त्यांचा सक्रिय सहभाग होता. ते ६० वर्षांहून अधिक काळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून कार्यरत होते.

शास्त्रीय संगीतापासून कोठी संगीतापर्यंतचे सर्व संगीत प्रकार बाबूजींनी अत्यंत कौशल्याने हाताळले. बाबूजींनी ‘सुलश्री’ प्रतिष्ठान स्थापन करून संगीत विषयक उपक्रम सुरू केले. सन १९८० ते ८५ या काळात ते मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष होते.

त्यांना चित्रपट संगीतातील योगदानाबद्दल फाळके पारितोषिक तसेच सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून महाराष्ट्र राज्य पारितोषिकेही मिळाली आहेत. बाबूजींनी आपल्या आयुष्यात संगीताच्या सेवेबरोबर समाजसेवेला देखील प्राधान्य दिले होते.

त्यांच्या आयुष्यातील एक विशेष पैलू म्हणजे त्यांची प्रखर राष्ट्रभक्ती, ध्येय निष्ठा आणि समाजसेवा! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावान स्वयंसेवक म्हणून त्यांनी समाजसेवा केली. काही काळ प्रचारक म्हणून देखील कार्य केले होते. त्याचप्रमाणे गोवा मुक्ति संग्रामात त्यांचा मोलाचा सहभाग होता. दादरा नगर हवेली मुक्तीसाठी बाबूजी आणि त्यांच्या पत्नी ललिताबाई यांनी देखील सहभाग घेतला होता.

बाबूजी हे स्व. सावरकर यांचे निस्सीम भक्त होते. त्यांनी ‘सावरकर दर्शन प्रतिष्ठान’ची निर्मिती केली होती. स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील चित्रपट हा त्यांचा ध्यास होता. अनेक अडचणी आणि लोकप्रवादांवर मात करून अखेर २००२ साली त्यांनी ‘वीर सावरकर’ हा चित्रपट पूर्ण केला.

२९ जुलै २००२ रोजी वृद्धापकाळाने बाबूजींचे मुंबई येथे निधन झाले. बाबूजींचा हा जीवनप्रवास आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायक आहे. त्यांची संगीतसाधना आणि सार्वजनिक आयुष्य हा येणाऱ्या पिढ्यांसाठी आदर्श आहे.

बाबूजींना विनम्र आदरांजली!

-संकलित

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 25-07-2026 News publication date | Time: 11:36 AM News publication time | Views: 31 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 25-07-2026 News publication date | Time: 11:36 AM News publication time | Views: 31 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement