महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत)च्या वतीने विद्यार्थ्यांना प्रशासनाची कार्यपद्धती प्रत्यक्ष समजावी, नागरिकांमध्ये सुजाण नागरिकत्वाची भावना निर्माण व्हावी आणि विद्यार्थी व प्रशासन यांच्यात विश्वासाचे नाते दृढ व्हावे या उद्देशाने 'अमृत संवाद सेतू' हा अभिनव उपक्रम राज्यभर राबविण्यात येत आहे.
हिंगोली : विद्यार्थ्यांना प्रशासनाची कार्यपद्धती, शासकीय कार्यालयांचे कामकाज आणि नागरिकांचे अधिकार व कर्तव्ये यांची प्रत्यक्ष माहिती मिळावी, तसेच विद्यार्थी आणि प्रशासन यांच्यात विश्वासाचे नाते अधिक दृढ व्हावे या उद्देशाने महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या माध्यमातून 'अमृत संवाद सेतू' हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना विविध शासकीय कार्यालयांना भेट देण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. संबंधित विभागातील अधिकारी विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून कार्यालयीन कामकाज, विविध शासकीय योजना, नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा तसेच प्रशासनातील पारदर्शकता आणि जबाबदाऱ्या याविषयी सविस्तर माहिती देणार आहेत.
'अमृत संवाद सेतू'च्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, सामाजिक जबाबदारी, संविधानिक मूल्यांची जाणीव आणि लोकशाही प्रक्रियेबाबत सकारात्मक दृष्टिकोन विकसित करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध विभागांचे कार्य जवळून समजून घेण्याची आणि आपल्या शंकांचे थेट निरसन करून घेण्याची संधी मिळणार आहे.
या उपक्रमामुळे विद्यार्थी आणि प्रशासन यांच्यात प्रभावी संवाद निर्माण होऊन परस्पर विश्वास अधिक दृढ होईल, तसेच भविष्यात सुजाण, जबाबदार आणि राष्ट्रहिताची जाणीव असलेली नागरिकांची पिढी घडण्यास मदत होईल, असा विश्वास अमृत संस्थेने व्यक्त केला आहे. इच्छुक शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्था यांनी या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आपल्या जिल्ह्यातील अमृत जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क :७३९१०६५४७१
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment