डॉ. आशिष कुमार दासगुप्ता हे आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्यातीप्राप्त असलेले एक अग्रगण्य भारतीय इतिहासतज्ज्ञ होते. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा हा आढावा.
त्यांचा जन्म २२ ऑगस्ट १९३१ रोजी कोलकाता येथे झाला. आधुनिक भारताचा इतिहास, विशेषतः १७ व्या आणि १८ व्या शतकातील सागरी व्यापार आणि हिंदी महासागरातील व्यापारी समुदाय यांच्या अभ्यासासाठी ते जगभरात ओळखले जातात. त्यांनी कलकत्त्याच्या प्रसिद्ध प्रेसिडेन्सी कॉलेजमधून पदवी पूर्ण केली आणि त्यानंतर केंब्रिज विद्यापीठातून इतिहास विषयात पदव्युत्तर व पीएचडीचे शिक्षण घेतले. त्यांनी प्रेसिडेन्सी कॉलेज, विश्वभारती विद्यापीठ (शांतीनिकेतन) येथे इतिहास विषयाचे अध्यापन केले. याशिवाय, ऑक्सफर्ड, हायडेलबर्ग आणि व्हर्जिनिया यांसारख्या जगातील नामांकित विद्यापीठांमध्ये त्यांनी अभ्यागत प्राध्यापक म्हणून कार्य केले. त्यांनी कलकत्त्याच्या 'नॅशनल लायब्ररी'चे संचालक (१९८४-१९९०) आणि 'विश्वभारती विद्यापीठा'चे कुलगुरू म्हणूनही जबाबदारी सांभाळली.
युरोपीय इतिहासकारांनी आशियातील व्यापारी इतिहासाकडे दुर्लक्ष करून युरोपला अधिक महत्त्व दिले होते. डॉ. दासगुप्ता यांनी डच ईस्ट इंडिया कंपनीच्या मूळ नोंदींचा सखोल अभ्यास करून, हिंदी महासागरातील भारतीय व्यापारी आपले वर्चस्व कसे टिकवून होते, हे पुराव्यानिशी मांडले. त्यांचे ऐतिहासिक संशोधनपर ग्रंथ आंतरराष्ट्रीय स्तरावर संदर्भग्रंथ मानले जातात: मलबार इन एशियन ट्रेड (Malabar in Asian Trade 1740-1800), इंडियन मर्चंट्स अँड द डिक्लाईन ऑफ सुरत (Indian Merchants and the Decline of Surat, c. 1700-1750), मर्चंट्स ऑफ मेरीटाईम इंडिया (Merchants of Maritime India, 1500-1800) हे त्यांचे काही महत्त्वपूर्ण ग्रंथ आहेत.
आयुष्याच्या उत्तरार्धात एका गंभीर व वेदनादायी आजाराने त्यांना ग्रासले होते. तरीही त्यांनी हार न मानता व्हीलचेअरवर बसूनच अनेक लेख व पुस्तके लिहून काढली. ४ जून १९९८ रोजी कलकत्ता येथे त्यांचे निधन झाले.
-संकलित
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment