अत्यंत दुर्दैवी असे जालियनवाला बाग हत्याकांड १३ एप्रिल १९१९ रोजी घडले होते.
काही घटनांच्या स्मृती कितीही काळ लोटला तरी कायम राहतात. काळ जातो, तसे त्यांचे विस्मरण होण्याऐवजी त्यांची दाहकता अजूनच जाणवते. भारतीय इतिहासातील अशीच एक दुर्दैवी घटना म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांड. भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात १३ एप्रिल हा दिवस कायमस्वरूपी स्मरणात राहणारा. कारण १३ एप्रिल १९१९ रोजी अमृतसरमधील जालियनवाला बाग या ठिकाणी शांततेने आंदोलन करण्यासाठी एकत्र जमलेल्या भारतीयांवर ब्रिटिश अधिकारी जनरल डायरने गोळीबार केला. या गोळीबारात शेकडो भारतीयांना आपला जीव गमवावा लागला.
१९१९ साली ब्रिटिश सरकार रौलेट कायदा आणण्याच्या तयारीत होते. या कायद्यामुळे कोणत्याही भारतीयला फक्त संशयावरून, कोणताही खटला दाखल न करता तुरुंगात टाकण्याचा अधिकार ब्रिटिशांना मिळणार होता. भारतीयांनी या कायद्याला कडाडून विरोध केला; पण त्याला न जुमानता मार्चपासून हा कायदा लागू करण्यात आला. याच्या निषेधार्थ ठिकठिकाणी आंदोलने, निदर्शने सुरू झाली. रौलेट कायद्याच्या विरोधात महात्मा गांधी यांनी सहा एप्रिल रोजी देशव्यापी आंदोलन घोषित केले. त्या वेळी अमृतसरचे लोकप्रिय नेते डॉ. सत्यपाल आणि सैफुद्दीन किचलू यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्या या अटकेचा निषेध करण्यासाठी लोकांनी आंदोलन सुरू केले. त्याच्या विरोधात ब्रिटिशांनी पंजाबमध्ये मार्शल लॉ पुकारला आणि कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी ब्रिगेडियर जनरल डायर यांच्याकडे सोपवली.
१३ एप्रिल १९१९ या दिवशी अमृतसरमधील जालियनवाला बाग येथे रौलेट कायदा मागे घेण्यासाठी आणि नेत्यांची सुटका करण्यासाठी अमृतसरमधील हजारो लोक जालियनवाला बागेत एकत्र जमले. जनरल डायरच्या बेकायदेशीर जमावबंदीच्या आदेशांचे उल्लंघन करून, लोक दोन ठरावांवर चर्चा करण्यासाठी जालियनवाला बाग येथे जमले होते. एकाने १० एप्रिलच्या गोळीबाराचा निषेध केला, तर अधिकाऱ्यांनी त्यांच्या नेत्यांना सोडावे अशी मागणी दुसऱ्याने केली. जेव्हा जनरल डायरला ही बातमी मिळाली, तेव्हा तो आपल्या सैन्यासह बागेकडे निघाला. त्याने बागेत प्रवेश केला, आपले सैन्य तैनात केले आणि लोकांना पूर्वसूचना न देता गोळीबार करण्याचा आदेश दिला. लोक बाहेर पडण्याच्या मार्गांकडे धावले; पण डायरने आपल्या सैनिकांना त्यांच्यावर गोळीबार करण्याचा आदेश दिला. हा गोळीबार १०-१५ मिनिटे चालला.
बाग सर्व बाजूंनी इमारतींनी वेढलेली होती आणि तिला फक्त एकच अरुंद प्रवेशद्वार होते. ते सैनिकांनी बंद केले होते. त्यामुळे लोकांना बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग उरला नव्हता. एकूण १६५० फैरी झाडण्यात आल्या. दारुगोळा संपल्यावरच गोळीबार थांबवण्यात आला. जनरल डायर आणि मिस्टर आयर्विंग यांनी एकूण २९१ मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला; मात्र मदनमोहन मालवीय यांच्या नेतृत्वाखालील समितीच्या अहवालासह इतर अहवालांनुसार, मृतांची संख्या त्यापेक्षा कितीतरी जास्त होती. या गोळीबारात हजाराच्या वर लोकांना आपला जीव गमवावा लागला, अनेकांनी आपला जीव वाचवण्यासाठी त्या ठिकाणच्या विहिरीत उड्या घेतल्या. नंतर या घटनेची चौकशी करण्यासाठी हंटर कमिशनची नियुक्ती करण्यात आली होती.
जालियनवाला बाग हत्याकांडामुळे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यावर खोलवर परिणाम झाला. या हत्याकांडामुळे ब्रिटिशांची जुलूमशाही दिसली आणि वसाहतवादी राजवटीविरुद्धचा लढा तीव्र करणाऱ्या राष्ट्रवादी भावनांना खतपाणी घातले गेले. ब्रिटिश धर्मांधतेचा पर्दाफाश झाला. जालियनवाला बाग हत्याकांडाने ब्रिटिश राजवटीचे वंशद्वेषी आणि जुलमी स्वरूप अधोरेखित केले. तसेच, वसाहतवादी सरकारला भारतीय जीवांबद्दल असलेली तीव्र अनास्थाही या घटनेने उघड केली. या हत्याकांडामुळे अनेकांना, विशेषतः ब्रिटिश राजवटीच्या न्यायावर विश्वास ठेवणाऱ्या मध्यममार्गी लोकांना धक्का बसला. या घटनेची चौकशी करण्यासाठी स्थापन केलेला हंटर आयोग न्याय देण्यात अयशस्वी ठरला. जनरल डायर यांना कोणतीही कठोर शिक्षा झाली नाही—त्यांना केवळ सेवेतून मुक्त करण्यात आले आणि भारतात पुढील नोकरी करण्यास बंदी घालण्यात आली. परंतु त्यानंतर कोणताही खटला चालवला गेला नाही.
या हत्याकांडामुळे भारतीय स्वातंत्र्य चळवळीला लक्षणीय गती मिळाली. या घटनेने ब्रिटिश राजवटीचे क्रूर वास्तव उघडकीस आणले आणि वसाहतविरोधी कारवायांना मिळणारा पाठिंबा वाढवला. ब्रिटिश राजवट संपवण्याचा निर्धार केलेल्या तरुण स्वातंत्र्यसैनिकांच्या उदयाला या घटनेमुळे चालना मिळाली.
जालियनवाला बाग हत्याकांड हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील सर्वांत काळ्या अध्यायांपैकी एक म्हणून ओळखले जाते. या घटनेने भारतीय स्वातंत्र्यलढ्याला एक मोठे वळण दिले. या दुःखद घटनेची आठवण भावी पिढ्यांना दडपशाही आणि अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचा एक चिरस्थायी धडा देते.
(संकलित)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment