१२४६पासून सुरू असलेली वैशिष्ट्यपूर्ण परंपरा
नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा रांगेतील अक्कलकुवा येथील काठी गावाची ७७० वर्षांहून अधिक जुनी राजवाडी होळी हे आदिवासी संस्कृतीचे एक अनोखे प्रतीक आहे. ही होळी १२४६मध्ये राजा उमेद सिंग यांनी सुरू केली होती. दर वर्षी हजारो आदिवासी बांधव पारंपरिक वेशभूषा आणि ढाल-तलवारीसह डफ-पावा या वाद्यांच्या तालावर होळीभोवती नृत्य करतात. त्यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशातील आदिवासी आवर्जून सहभागी होतात.
गुजरात राज्यातून जवळपास ३०० ते ४०० किलोमीटर पायपीट करून होळीसाठी लागणारा बांबू (काठी) ते जंगलातून घेऊन येतात. मग त्याची पूजा-अर्चा करून जमिनीमध्ये २० फूट खड्डा करून त्यात पुरतात. राजवाडी होळीचे वारसदार म्हणून पृथ्वीसिंग पाडवी यांच्या हस्ते पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास होळी प्रज्ज्वलित करण्यात आली. यंदा ही होळी दोन मार्च २०२६ रोजी साजरी केली गेली. १५ दिवस चालणाऱ्या या उत्सवात बांबूची होळी, भोंगऱ्या बाजार आणि ढोल-पावरी हे नृत्याचे मुख्य आकर्षण असते.
काठी-राजवाडी होळीची वैशिष्ट्ये :
ही राजवाडी होळी निसर्गपूजेचे प्रतीक मानली जाते. पारंपरिक ढोल-पावरी नृत्य आणि होळीच्या १५ दिवस आधीपासून चालणारा प्रसिद्ध भोंगऱ्या बाजार हे येथील वैशिष्ट्य आहे. काठी येथील ही आदिवासी होळी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा एक भाग आहे. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशमधून ही होळी पाहण्यासाठी भाविक व पर्यटक मोठी गर्दी करतात. त्यात नवस घेऊन आलेल्यांचीही गर्दी प्रचंड प्रमाणात असते. आजही ही परंपरा अविरतपणे चालू आहे.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment