अमृत संस्थेच्या योजनेतून मिळाले अर्थसाह्य
अमरावती : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवल्या जातात. अमरावती जिल्ह्यातील वेद अग्रवाल या विद्यार्थ्यालाही एका योजनेचा लाभ झाला आहे. वेद अग्रवाल यांना पवई (मुंबई) येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या नामवंत संस्थेत सिव्हिल इंजिनीअरिंग या शाखेत बीटेक अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला आहे. त्यांच्या उच्च शिक्षणासाठी अमृत संस्थेतर्फे ६० हजार रुपयांचे शैक्षणिक अर्थसाह्य देण्यात आले आहे.
उच्च शिक्षणाचा वाढता खर्च लक्षात घेता, योग्य वेळी मिळणारे आर्थिक साह्य विद्यार्थ्यांसाठी मोठा आधार ठरते. अमृत संस्थेने दिलेल्या या मदतीमुळे वेद यांच्या शैक्षणिक प्रवासाला मोठी गती मिळाली असून, शिक्षणाचा खर्च उचलणे सुलभ झाले आहे.
अमृत संस्थेच्या विविध योजना आणि उपक्रमांमुळे जिल्ह्यातील अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना नवी दिशा मिळत आहे. आर्थिक अडचणीमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये, या उद्देशाने संस्था सातत्याने कार्यरत आहे.
वेद अग्रवाल यांनी नामवंत संस्थेत प्रवेश मिळवल्याबद्दल त्यांचे आणि योजनेतून अर्थसाह्य करणाऱ्या अमृत संस्थेचेही कौतुक होत आहे.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment