अन्यायाविरुद्ध उभा राहिलेला दिव्य योद्धा
परशुराम म्हणजे भगवान विष्णूंचा सहावा अवतार. जमदग्नी ऋषी आणि रेणुकामाता यांच्यापोटी परशुरामांचा जन्म झाला. ब्राह्मण असून क्षत्रियांचे सर्व गुण यांच्यात होते.
अग्रत: चतुरो वेदा: पृष्ठत: सशरं धनु:।
इदं ब्राह्मं इदं क्षात्रं शापादपि शरादपि।।
असे त्यांचे वर्णन केले जाते. भगवान शंकरांकडून त्यांना परशू हे शस्त्र मिळाले आणि अनेक विद्या त्यांनी आत्मसात केल्या. त्याच विद्यांच्या जोरावर त्यांनी दुष्ट आणि प्रजेचा जाच करणार्या दुर्जन क्षत्रिय राजांचा बंदोबस्त केला. त्याच वेळी त्यांनी सहस्रार्जुनाला ठार केले. पुढे राजांना जिंकून ताब्यात घेतलेली जमीन ऋषिकुलाला देऊन ते महेंद्र पर्वतावर तप करण्यासाठी निघून गेले.
त्यानंतर परशुरामांचा उल्लेख सीता स्वयंवरात येतो. तेथे त्यांनी शिवधनुष्य तोडणार्या रामाला आव्हान दिले; मात्र राग शांत झाल्यावर आपल्याकडील धनुष्य त्यांनी रामाला भेट दिले. पुढे त्यांनी भीष्मांना त्या सगळ्या विद्या दिल्या. नंतर अंबेच्या याचनेवरून त्यांनी भीष्मांशी युद्ध केले. भीष्मांची हार झाली; पण तरीही त्यांनी अंबेशी लग्न करण्यास नकार दिला.
असे म्हणतात, की कोकणाच्या भूप्रदेशाची निर्मिती परशुरामाने समुद्र ४०० योजने मागे हटवून केली आहे. म्हणूनच परशुरामाला सप्त कोकणाचा देव म्हणतात. संपूर्ण भारतात समुद्रालगतच्या राज्यांमध्ये परशुरामाची ही कथा सांगितली आणि ऐकली जाते. त्यामुळे संपूर्ण भारतात परशुराम क्षेत्रे आहेत. केरळची भूमी परशुरामाने निर्माण केली असे सांगत. तिथेही एक परशुराम क्षेत्र आहे. ओडिशा, आसाम, गुजरात आणि पंजाबमध्येही परशुराम क्षेत्र आहे. तसेच ते कोकणातही आहे. परशुराम हा चिरंजीव अवतार आहे.
कोकणात चिपळूणपासून चार किलोमीटर अंतरावर मुंबई-गोवा महामार्गावर एक हजार फूट उंचीचा डोंगर आहे. त्याला महेंद्रगिरी असे नाव आहे. तिथे असलेल्या परशुरामांच्या मंदिरामुळे लगतच्या गावालाही परशुराम असेच म्हणतात.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment