बोधकथा - २६
एका गावात एक तरुण साधक राहत होता. चौदा वर्षांच्या कठोर तपश्चर्येनंतर त्याला पाण्यावर चालण्याची अद्भुत सिद्धी प्राप्त झाली. त्याने गुरूंना, श्री रामकृष्ण परमहंसांना हे सांगायचं ठरवलं. त्यांच्याकडे जाऊन तो उत्साहाने म्हणाला, 'गुरुदेव! १४ वर्षांच्या साधनेनंतर मला पाण्यावर चालण्याची सिद्धी मिळाली आहे! नदीवरून मी चालत पलीकडे जाऊ शकतो!'
श्री रामकृष्ण परमहंस शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिले. ते म्हणाले, 'चौदा वर्षं साधना करून तू हेच शिकलास? हे काम तर आठ आणे देऊन नावाडीही सहजपणे करतो.'
तो साधक गोंधळून गेला. त्याचा अभिमान क्षणात विरघळला. तो खाली मान घालून उभा राहिला. रामकृष्ण परमहंस पुढे म्हणाले, 'खरी साधना म्हणजे चमत्कार दाखवणं नाही. मन शुद्ध करणं, अहंकारावर विजय मिळवणं, दुसऱ्यांवर प्रेम करणं आणि ईश्वराची अनुभूती घेणं ही खरी सिद्धी आहे.'
साधकाला योग्य ती दिशा मिळाली होती...
बोध : कोणत्याही गोष्टीत यशस्वी होण्यासाठी साधना आवश्यक आहेच; पण त्यासाठी दिशा योग्य असणेही अत्यंत महत्त्वाचे आहे.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment