बोधकथा - २५
एक राजा आपल्या निष्पक्ष न्यायदानासाठी खूपच प्रसिद्ध होता. एक दिवस तो आपल्या राज्याच्या तुरुंगातील सर्व गुन्हेगारांना भेटण्यासाठी गेला. तो प्रत्येक गुन्हेगाराला भेटला आणि त्यांना विचारू लागला, की त्यांना कुठल्या गुन्ह्याची शिक्षा मिळत आहे. सर्वांनी आपापली कारणं सांगितली.
एका कैद्याने सांगितले, "महामहीम! खरे तर मी इथे असायलाच नको. मंत्र्याच्या चुकीच्या निर्णयामुळे मी येथे पोहोचलो आहे."
दुसऱ्या एकाने सांगितले, "हे राजन्! मी निर्दोष आहे. विरोधी पक्षाने न्यायाधीशाला लाच दिली होती आणि म्हणून मी इथे आहे."
आणखी एका कैद्याने सांगितले, की "हे तर एका गैरसमजुतीमुळे झाले आहे. मी काहीच अपराध केलेला नाही."
अशा प्रकारे त्या सर्व कैद्यांनी दावा केला, की ते सर्व निर्दोष आहेत. कोणीच आपली चूक कबूल केली नाही.
तुरुंगात राजाची नजर बाजूला शांतपणे उभ्या असलेल्या एका कैद्यावर पडली. राजाने त्याला तोच प्रश्न विचारला, तेव्हा त्याने सांगितले, की "महाराज, मी एक अपराधी आहे. माझ्याकडून अपराध झाला आहे म्हणून मी इथे आहे."
राजाला तेथे असलेल्या शिपायांकडून कळले, की तुरुंगात केवळ तोच एक कैदी असा आहे, की ज्याची वर्तणूक चांगली आहे. राजाने लगेचच त्याच्या सुटकेचे आदेश जारी केले.
बोध : जोपर्यंत आपण आपल्या दोषाचा स्वीकार करत नाही, तोपर्यंत आपल्यामध्ये सुधारणा होऊ शकत नाही.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment