मानवतेला मोठे करणारा कार्यकर्ता
आपण माणूस म्हणून जगतो खरे; पण खरेच आपण मानवतेने जगतो का? असा प्रश्न पडण्याचे कारण जगात अनेक निराधार लोक आहेत, ज्यांना आपले असे कोणी नाही. अनेक वृद्ध आहेत ज्यांना त्यांच्या आपल्यांनी घराबाहेर काढले आहे. अशी निराधार माणसे आपल्याला रस्त्याच्या कडेला दिसतात. ‘गरीब बिचारे’ म्हणून आपण चुकचुकतो आणि आपापल्या कामाला लागतो. ती माणसे मग तशीच आयुष्य काढत जगतात. त्यातील काही दुर्दैवी लोक तसेच बेवारस म्हणून मरून जातात. मेल्यानंतरही त्यांची अवहेलना संपत नाही. अशा मृतांवर सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार करणारी व्यक्ती म्हणजे मध्य प्रदेशातील इंदूर येथील जयू जोशी.
जयू जोशी आणि त्यांच्या टीमने आतापर्यंत ११ हजार लोकांवर अंत्यसंस्कार केलेले आहेत. एखादा मृतदेह सापडला, पोलिसांची चौकशी झाली, त्या मृतदेहाचा ताबा घेण्यास कोणी पुढे आले नाही, की जयू जोशी आणि त्यांची टीम योग्य त्या औपचारिकतेची पूर्तता करून त्या देहावर शास्त्रपूर्वक अंत्यसंस्कार करतात. ती व्यक्ती ज्या धर्माची असते त्यानुसार दहनसंस्कार किंवा दफनविधी करतात. इतकेच नाही, तर इंदूरच्या रस्त्यांवर कोणी आजारी, निराधार व्यक्ती दिसली की त्यांच्यावर उपचार करतात, ती व्यक्ती बरी झाल्यावर त्यांचे पुनर्वसन करण्यासही मदत करतात. अनेक बेवारस मुलांची सुटकाही त्यांनी या माध्यमातून केलेली आहे. जयू जोशी आणि त्यांच्या टीमचे हे कार्य खरेच मानवतेला मोठे करणारे आहे. त्यांच्या या कार्याला वंदन!
(संकलित)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment