बोधकथा - ८
एकदा एका शेतकऱ्याच्या लक्षात आले, की त्याच्या हातातील घड्याळ धान्याच्या कोठारात हरवले आहे. ते एक साधे घड्याळ असले, तरी त्याच्या लेखी त्याला अफाट भावनिक मूल्य होते. बराच वेळ सर्वत्र शोधल्यावरही त्याला ते घड्याळ सापडेना. मग त्याने कोठाराच्या बाहेर खेळत असलेल्या मुलांना घड्याळ शोधण्यासाठी बोलावले. त्याने त्या मुलांना वचन दिले, की जो कोणी त्याचे घड्याळ शोधून देईल, त्याला बक्षीस मिळेल. हे ऐकून सगळी मुले लगबगीने कोठारात गेली. सगळीकडे शोधायला लागली; पण त्यांना घड्याळ कुठेही सापडेना.
जेव्हा त्या शेतकऱ्याने घड्याळाचा शोध घेण्याचे थांबवायचे ठरवले, तेव्हा एक मुलगा त्याच्या जवळ जाऊन शेतकऱ्याकडे शोधण्याची एक संधी मागू लागला. शेतकरी त्याच्याकडे बघून विचार करू लागला, की 'बिघडले कुठे...! हा मुलगा प्रामाणिक दिसतोय. देऊ या त्याला एक संधी!' शेतकऱ्याने त्या छोट्या मुलाला घड्याळाचा शोध घेण्यासाठी कोठारात पाठवले.
थोड्याच वेळात तो मुलगा हातात घड्याळ घेऊन नाचत नाचतच बाहेर आला. शेतकऱ्याला आनंद झाला आणि आश्चर्यही वाटले! त्याने त्या मुलाला विचारले, की बाकीच्यांना अपयश आले; पण त्याला हे यश कसे काय प्राप्त झाले?
मुलगा म्हणाला, 'मी वेगळे काहीच नाही केले; पण जमिनीवर शांत बसून राहिलो आणि ऐकू लागलो. त्या शांततेत मला घड्याळाची टिक-टिक ऐकू आली आणि मी त्या दिशेने शोधू लागलो.'
बोध : एक शांत मन त्रासलेल्या मनापेक्षा चांगल्या पद्धतीने विचार करू शकते. तुमच्या मनाला रोज काही क्षणांसाठी तरी शांतता द्या आणि मग पाहा, तुमच्या अपेक्षेप्रमाणे तुमचे मन तीक्ष्णपणाने काम करून तुमचे जीवन कसे सजवेल!
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment