बोधकथा- ५२
पाप आणि पुण्य यांची अतिशय सोपी व्याख्या संत तुकाराम महाराजांनी केली आहे. ते म्हणतात – “पुण्य परउपकार | पाप ते परपीडा ||” पौराणिक वाङ्मयात देव आणि राक्षस या संकल्पना पाहायला मिळतात. जे सगळ्यांशी प्रेमाने वागतात, सगळ्यांना मदत करतात, कुणीही दु:खी नसावे असे ज्यांना मनापासून वाटते, ते देव. याउलट दुसऱ्यांचे चांगले न पाहणे, दुसऱ्याला दु:ख होईल असे वागणे, छळणे, त्रास देणे ही कामे राक्षस करीत असत.
याचे आदर्श उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. ते फक्त राजे नव्हते तर त्यांनी अनेक जणांना मदतीचा हात दिला होता, संकटकाळी ते त्यांच्या पाठीशी उभे राहिले होते. अशी सदैव जनकल्याणाची भावना मनात असणाऱ्या रयतेच्या राजाला समर्थ रामदासांनी “बहुत जनांसी आधारू” अशी उपमा दिली होती. त्याकाळी मोगल सैन्याने सामान्यजनांना आपल्या अन्यायाने सळो की पळो करून सोडले होते. अशा वेळी छत्रपतींचा जन्म झाला. महाराजांनी अनेक साधू संतांना आश्रय दिला. अनेक देवस्थानांना जमिनी इनाम दिल्या. आपल्या पुरुषार्थाने प्रजेचा छळ करणाऱ्या अफझलखानासारख्या दैत्याचा वध केला. शेतकऱ्यांना, व्यावसायिकांना कर्जे दिली. त्याचप्रमाणे आपली भूमिका सदैव मदतीची असावी. फक्त स्वतःचा स्वार्थ न पाहता शक्य असेल त्या पद्धतीने राष्ट्रकार्यातही सहभागी व्हावे.
संदर्भ- संस्कारांचे मोती
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment