ठिबक सिंचन, यांत्रिकीकरणाचा वापर करून केली समस्यांवर मात
जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यात बोधनापुरी नावाचे गाव आहे. त्या गावातील अतुल किडे यांनी पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन शेतीत यशप्राप्ती केली आहे. कडक उन्हाळ्यातही हिरवीगार असलेली त्यांची मोसंबी बाग परिसरातील शेतकऱ्यांसमोर प्रेरणादायी आदर्श म्हणून उभी आहे. अतुल किडे हे अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटातील होतकरू शेतकरी आहेत.
अतुल यांनी आपल्या शेतीमध्ये ठिबक सिंचन प्रणालीचा प्रभावी वापर केला आहे. त्यामुळे पाण्याची बचत होत असून, उच्च प्रतीचे मोसंबी उत्पादन घेणे शक्य झाले आहे. ट्रॅक्टरच्या साह्याने मशागत, पेरणी व फवारणी केल्यामुळे मनुष्यबळ कमतरतेच्या समस्येवर मात करता आली आहे. त्यामुळे वेळ आणि खर्चाची मोठी बचत होत असल्याचे त्यांनी सांगितले.
आजच्या स्पर्धेच्या युगात मजुरांच्या कमतरतेमुळे शेती पडीक राहत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळते; मात्र अतुल किडे यांनी आधुनिक तंत्रज्ञान, मेहनत आणि योग्य नियोजनाच्या बळावर शेती फायदेशीर ठरू शकते हे दाखवून दिले आहे.
'शेती हीच जीवनदायिनी आहे,' असे सांगणाऱ्या अतुल यांच्या बोलण्यात शेतीबद्दलचा आत्मविश्वास आणि जिव्हाळा स्पष्टपणे जाणवत होता. शेतीपासून दूर जाणाऱ्या तरुणांसमोर त्यांनी एक सकारात्मक आणि प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे.
अतुल किडे यांचे संपूर्ण कुटुंबच शेती व्यवसायात सक्रिय असून, मोसंबी बागेत सोयाबीन, हरभरा आणि गहू यांसारख्या आंतरपिकांचेही उत्पादन घेतले जाते. आधुनिक शेतीच्या माध्यमातून प्रगतीचा मार्ग कसा खुला होऊ शकतो, याचे उत्तम उदाहरण त्यांच्या शेतीतून पाहायला मिळते.
अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक नितीन खेकाळे यांनी शेताला भेट देऊन अतुल किडे यांच्या शेतीची पाहणी केली. त्यांनी किडे परिवाराला विविध शासकीय योजनांची माहिती देऊन आधुनिक शेतीसाठी मार्गदर्शन केले, तसेच त्यांच्या प्रगतिशील कार्याबद्दल शुभेच्छा दिल्या.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment