चार आणि पाच एप्रिलला मुंबईच्या स्वातंत्र्यवीर स्मारक ट्रस्टचा उपक्रम
मुंबई : असंख्य क्रांतिकारकांनी असह्य यातना सोसून केलेल्या संघर्षानंतर आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अंदमानमध्ये काळ्या पाण्याच्या शिक्षेवेळी कोलू ओढण्याचेही काम केले. हे अतिशय कष्टाचे काम असते. ते किती यातनादायी असते, याची कल्पना प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय येणे शक्य नाही. म्हणूनच मुंबईच्या स्वातंत्र्यवीर सावरकर ट्रस्टने तो अनुभव घेण्याची संधी उपलब्ध केली आहे. चार आणि पाच एप्रिल रोजी ट्रस्टच्या कार्यालयात हा अनुभव घेता येणार आहे.
अंदमानच्या सेल्युलर कारागृहात स्वातंत्र्यवीर सावरकर, त्यांचे ज्येष्ठ बंधू बाबाराव सावरकर आणि इतर सर्वच क्रांतिकारकांना बैलाच्या जागी कोलूला जुंपले जात असे. आठ तास कोलू फिरवून त्यांना तीस पौंड म्हणजे साडेतेरा ते चौदा लिटर तेल काढावे लागत असे. तेवढे तेल काढल्यास न थांबता कोलू फिरवावा लागे आणि अमानुष शिक्षाही केल्या जात. या अघोरी छळाला कंटाळून इंदुभूषण राय यांच्यासारख्या अनेक क्रांतिकारकांनी आत्महत्या केली. अनेक वीरांचे मानसिक संतुलन ढळले. भारतमातेच्या अशा अनेक सुपुत्रांनी सोसलेल्या यातनांचा अनुभव घेतल्यानंतर स्वातंत्र्याचे मोल चांगल्या पद्धतीने कळू शकते. म्हणून या उपक्रमामध्ये कोलू चालवण्याचा अनुभव घ्यावा, असे संस्थेने कळवले आहे.
यात सहभागी होण्यासाठी वयाची किमान १५ वर्षे पूर्ण असणे आवश्यक असून, १८ वर्षांखालील मुला-मुलींना सहभाग घ्यायचा असेल, तर त्यांच्याबरोबर कोणीतरी पालक असणे आवश्यक आहे. आरोग्याशी संबंधित काही समस्या किंवा तक्रारी असलेल्यांनी यात सहभागी होऊ नये, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
स्थळ : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक,
२५२, वीर सावरकर मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, दादर (प.), मुंबई - २८
दिवस : चार आणि पाच एप्रिल २०२६
वेळ : सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत.
संपर्क : 9220070386
नावनोंदणीसाठी लिंक : https://forms.gle/SVexjX6RbcNCTJFz6
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment