कारंजा येथील श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज मंदिरात झाले स्वागत
वाशिम : कारंजा येथील श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज मंदिरात (गुरुमंदिर) एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम पार पडला. अहिल्यानगर येथून प्रारंभ झालेल्या भगवान परशुराम परिक्रमेचे कार्य करत प्रवास करणाऱ्या विजया कुलकर्णी, पौर्णिमा जोशी, प्रसाद पुडे, महेश देशपांडे, गंगेय कुलकर्णी, अक्षय सराफ, बाळासाहेब जगताप व शुभम घटने आदी मान्यवरांनी कारंजा येथे आगमन झाल्यावर गुरुमंदिरातील व्यवस्थापक आणि कारंजा शहर ब्राह्मण सभेच्या अध्यक्षांची सदिच्छा भेट घेतली.
परिक्रमेच्या माध्यमातून भगवान परशुरामांच्या विचारांचा प्रसार, समाजातील एकात्मता वृद्धिंगत करणे, तसेच सांस्कृतिक मूल्यांचे जतन करणे हे संदेश देण्यात येत असल्याचे या वेळी सांगण्यात आले. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करून अशा परिक्रमा समाजाला प्रेरणा देणाऱ्या असल्याचे मत व्यक्त केले.
मंदिर व्यवस्थापक व ब्राह्मण सभेच्या अध्यक्षांनी परिक्रमा मंडळाचे स्वागत करून त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. भविष्यात अशा उपक्रमांमुळे समाजातील ऐक्य अधिक दृढ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. उपस्थितांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेऊन या उपक्रमाला पाठिंबा दर्शवला. ही परिक्रमा अहिल्यानगरमधून सुरू झाली असून, ती मध्य प्रदेशातील जानापावपर्यंत जाणार आहे.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment