पर्यटनाच्या ठिकाणी सर्व प्रकारच्या सोयीसुविधा मिळाव्या व युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशातून अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांच्या संकल्पनेतून 'अमृत पर्यटन' या विषयाचा उदय झाला. महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, ती खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या विकासासाठी कार्यरत आहे. या संस्थेचे निबंधक सिद्धेश्वर वरणगावकर यांनी या संकल्पनेबद्दल लिहिलेला हा लेख...
पर्यटन म्हटले, की प्रत्येकाला आनंद होतो. पर्यटन म्हणजे मनोरंजन, शिक्षण, व्यवसाय अथवा इतर कोणत्याही कारणासाठी आपले घर किंवा कामाचे ठिकाण सोडून केलेला प्रवास होय. पर्यटनाचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी काही प्रकार पुढीलप्रमाणे सांगता येतील. ऐतिहासिक पर्यटन, धार्मिक पर्यटन, कृषी पर्यटन, साहसी खेळ (क्रीडा) पर्यटन, सांस्कृतिक पर्यटन, निसर्ग पर्यटन, शैक्षणिक पर्यटन, इत्यादी. अमृत पर्यटन या विषयाचा उद्देश रोजगाराच्या माध्यमातून उत्पन्न वाढवणे, सांस्कृतिक आदानप्रदान करणे, तसेच व्यक्तीचा सर्वांगीण विकास होणे असा आहे. महाराष्ट्रात अजिंठा, वेरूळ, लोणार, महाबळेश्वर, लोणावळा, शेगाव, तुळजापूर, पंढरपूर, आळंदी, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले अशी एक ना अनेक पर्यटनस्थळे आहेत; मात्र अजूनही काही पर्यटनस्थळे विजनवासात आहेत. म्हणजेच त्यांची माहिती फक्त स्थानिक भागात आहे. इतर जगाला त्यांची माहिती नाही. अशा स्थळांची माहिती पर्यटकांना उपलब्ध करून देणे, पर्यटकांची राहण्याची व्यवस्था (होम स्टे) करणे, पर्यटकांना माफक दरात भोजनव्यवस्था उपलब्ध करून देणे, त्यांना स्थानिक खाद्यपदार्थ देणे, तसेच युवक-युवतींना टूर गाइड म्हणून प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, असे अमृत या संस्थेचे उद्दिष्ट आहे. आपण ट्रिप व टूर या दोन्ही शब्दांचा अनेकदा वापर करतो; पण त्यांचा नेमका अर्थ काय? ट्रिप म्हणजे एक आनंददायी लहान सहल. टूर म्हणजे एकापेक्षा अनेक ठिकाणी केलेला प्रवास होय. महाराष्ट्रातील पर्यटन उद्योग हा उद्योजकांसाठी संधीचा खजिना आहे. स्थानिक संस्कृती, निसर्ग आणि ग्रामीण जीवनशैली यांचा वापर करून उद्योजक आपला व्यवसाय यशस्वी करू शकतात. निवास, जेवण, स्थानिक भ्रमंतीसाठी आकर्षक पॅकेज डिझाइन तयार करता येईल. पर्यटकांना भ्रमंतीसाठी सायकल अथवा स्वयंचलित दुचाकी भाड्याने देणे हादेखील पर्यटनातील कमीत कमी गुंतवणुकीत सुरू करता येऊ शकेल, असा व्यवसाय आहे. स्थानिक युवक-युवतींना भाषा, इतिहास व कथाकथनाचे प्रशिक्षण दिले, तर पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी गाइड विकसित होतील, अशी अमृत संस्थेची धारणा आहे. उद्योजकांनी व्यवसाय करण्यासाठी बँकेकडून कर्ज घेतल्यास त्या कर्जाच्या व्याजाचे हप्ते अमृत संस्थेमार्फत वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा योजनेतून भरले जातात. म्हणजेच उद्योजकांना अमृत संस्था बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देते असे म्हणता येईल. यासाठी अमृत संस्थेचे प्रत्येक जिल्हा व्यवस्थापक हे उद्योजकांना मदत करण्यास तत्पर आहेत. एकंदरीत पर्यटनाशी संबंधित व्यवसाय सुरू करून उद्योजक आपली आर्थिक प्रगती करू शकतात. तसेच त्यांच्यासोबत अनुभव घेतलेली माणसे कायमची जोडली जाऊ शकतात. म्हणूनच म्हणता येईल, की - धरा अमृत पर्यटनाची कास जोडा माणसे व पैसा हमखास - सिद्धेश्वर वरणगावकर, अमृत (पुणे) संस्थेचे निबंधक ........ अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्षीत गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी,ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment