निसर्गरम्य परिसरातील श्री क्षेत्रेश्वर मंदिर

रायगड जिल्ह्यातील महादेवाचे प्रसिद्ध स्थान

निसर्गरम्य परिसरातील श्री क्षेत्रेश्वर मंदिर  मुख्य फोटो
निसर्गरम्य परिसरातील श्री क्षेत्रेश्वर मंदिर  अतिरिक्त फोटो

दोन्ही बाजूला डोंगर व मध्ये अरुंद दरी असल्यास त्या दरीला घळ म्हणतात. समर्थ रामदास स्वामींनी ‘दासबोध’ ग्रंथ लिहिला ती शिवथरघळ प्रसिद्ध आहे. कोकणात अशा अनेक घळी असून, बोलीभाषेत त्यांना घोळ म्हणतात. बहुतेकशा घोळांमध्ये वेगवेगळ्या देवतांचे स्थान असते. यापैकी रायगड जिल्ह्यातील वावे गावाजवळील तीन डोंगराच्या मध्ये असलेल्या घोळनगर परिसरातील क्षेत्रेश्वर महादेवाचे मंदिर प्रसिद्ध आहे. महादेवाला समर्पित असलेल्या या मंदिराशेजारी श्रीरामाचे व ज्ञानेश्वर माऊलींचे मंदिर असल्याने या परिसराला देवाची नवी आळंदी असेही म्हटले जाते.

श्री क्षेत्रेश्वर मंदिर या मंदिराबाबत आख्यायिका अशी, की पूर्वी येथील शेतात एक शेतकरी नांगरणी करीत असताना नांगराचा फाळ जमिनीत घट्ट रुतून बसला व त्या ठिकाणाहून पाणी वाहू लागले. हे पाणी कुठून येते याचा शोध घेण्यासाठी गावकऱ्यांनी खोदून पाहिले. तेव्हा सुमारे सात ते आठ फूट खोलात स्वयंभू शिवपिंडी आढळून आली. या पिंडीखालून गंगारूपी पाणी वाहत होते. त्यानंतर गावकऱ्यांनी या पिंडीच्या वर पेंढ्याच्या छताचे साधेसे मंदिर बांधले व पूजा-अर्चा सुरू केली. हे देवस्थान सुमारे चारशे वर्षांपूर्वीचे असल्याचे सांगितले जाते. १९९० साली लोकसहभागातून या मंदिराचा जीर्णोद्धार होऊन मंदिरास सध्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

असे सांगितले जाते, की रात्रीच्या वेळी क्षेत्रेश्वराच्या दर्शनासाठी डोंगरातून वाघ येऊन जातात; मात्र मंदिरात मुक्कामी थांबलेल्यांना व ग्रामस्थांना त्यांनी कधीही इजा केलेली नाही. या महादेवाने येथील अनेक पिढ्यांचे रक्षण केल्याची भावना गावकऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे ते या देवाला आपला क्षेत्रपाल असे संबोधतात. त्यामुळे या महादेवाचे 'क्षेत्राचा ईश्वर तो क्षेत्रेश्वर' असे नाव प्रचलित झाले. भाविकांची अशी श्रद्धा आहे, की क्षेत्रेश्वर भक्तांच्या हाकेला धाऊन जाणारा व नवसाला पावणारा देव आहे. पेण-अलिबाग मार्गावर वडखळजवळील वावे गावात हे मंदिर स्थित आहे. निसर्गसौंदर्याने नटलेल्या मार्गावरून मंदिराकडे जाताना सर्वप्रथम स्वागतकमान आहे. कमानीत दोन्ही बाजूला नक्षीदार चौकोनी स्तंभ आहेत व त्यावरील तुळईवर मध्यभागी महादेवाचे चित्र रंगवलेले आहे. त्याच्या दोन्ही बाजूस फणाधारी नागांची शिल्पे व नागांच्या बाजूला नंदीशिल्पे आहेत. पुढे मंदिराचे प्रशस्त प्रांगण आहे. प्रांगणात विविध प्रकारचे वृक्ष व सुंदर उद्यान आहे. प्रांगणात मंदिरासमोर चौथरा व त्यावर नक्षीकाम केलेले चौकोनी तुलसी वृंदावन आहे.

मुखमंडप, सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. मुखमंडपासमोर लोखंडी स्तंभांवर पत्र्याचे छत असलेला मंडप आहे. मंडपापेक्षा मंदिर उंचावर आहे. त्यामुळे मंदिराच्या मुखमंडपात जाण्यासाठी तीन पायऱ्या चढून यावे लागते. मुखमंडपात समोरील बाजूस चार चौकोनी स्तंभ व बांधीव कठडा आहे. सभामंडपाच्या लाकडी द्वारशाखांवर उभ्या धारेची नक्षी आहे. प्रवेशद्वाराच्या झडपांचा वरील अर्धा भाग पारदर्शक व खालील भागावर नक्षी आहे. सभामंडपात चार गोलाकार स्तंभ व त्यांवरील तुळयांवर छत आहे. वितानावर चक्राकार नक्षी आहे. नवसपूर्तीच्या अनेक पितळी घंटा छताला टांगलेल्या दिसतात. बंदिस्त स्वरूपाच्या या सभामंडपात हवा व सूर्यप्रकाश येण्यासाठी खिडक्या आहेत. सभामंडपात भाविकांना बसण्यासाठी आसने आहेत. जमिनीवर मध्यभागी यज्ञकुंड व गर्भगृहासमोर चौथऱ्यावर नंदीची मूर्ती आहे. अष्टकोनी गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीत प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस देवकोष्टके आहेत. उजव्या देवकोष्टकात गणपती व डावीकडे पार्वतीची मूर्ती आहे. प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर उभ्या धारेची नक्षी आहे. ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे. सभामंडपाहून खालच्या स्तरावर असलेल्या गर्भगृहात उतरण्यासाठी पाच पायऱ्या आहेत. गर्भगृहात जमिनीवर मध्यभागी स्वयंभू शिवपिंड आहे. शिवपिंडीतील शाळुंका चांदीच्या नक्षीदार आच्छादनाने सुशोभित आहे. शिवपिंडीवर शंकर व पार्वतीचे चांदीचे मुखवटे आहेत. शिवपिंडीवर पितळी नागाने छत्र धरलेले आहे.

गर्भगृहाच्या बाह्य बाजूने प्रदक्षिणा मार्ग आहे. प्रदक्षिणा मार्गावर बाहेर पडण्यासाठी प्रवेशद्वारे आहेत. गर्भगृहाच्या छतावर चौकोनी व वर निमुळते होत गेलेले शिखर आहे. शिखराच्या शीर्षभागी आमलक, त्यावर कळस व ध्वजपताका आहे. या मंदिरांच्या बाजूला श्रीराम, संत ज्ञानेश्वर महाराज यांचे मंदिर व गोड्या पाण्याचा तलाव आहे.

महाशिवरात्रीला येथे मुख्य वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी पहाटेस लघुरुद्र अभिषेक करून उत्सवास प्रारंभ होतो. दिवसभर भजन, कीर्तन, प्रवचन, संगीत, हरिपाठ, महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रात्री ढोल–ताशांच्या गजरात, गुलाल उधळीत पालखी मिरवणुकीने देवाची ग्रामप्रदक्षिणा होते. त्या वेळी हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी, नवस फेडण्यासाठी तसेच पालखी मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी येतात. या मंदिरांत दर श्रावणी सोमवारी भाविकांची गर्दी होते. सोमवार, पौर्णिमा, अमावास्या, एकादशी, प्रदोष आदी दिवशीही भाविकांची येथे गर्दी असते.

हे मंदिर वडखळ येथून दोन किलोमीटर, तर पेणपासून सात किलोमीटर अंतरावर आहे. मुंबई, ठाणे व रायगड जिल्ह्यातील अनेक शहरांतून वडखळसाठी एसटीची सुविधा उपलब्ध आहे. खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात. मंदिर परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही.

(संकलन - सुधीर लिमये, पेण)

Publisher: Shailesh Marathe News publisher name | Date: 04-01-2026 News publication date | Time: 10:06 PM News publication time | Views: 232 Number of times this news has been viewed | District: raigad Related district of the news
Publisher: Shailesh Marathe News publisher name | Date: 04-01-2026 News publication date | Time: 10:06 PM News publication time | Views: 232 Number of times this news has been viewed | District: raigad Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words