आषाढ महिना सुरू झाला की संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळेच चैतन्य संचारते. गावोगावी टाळ-मृदंगांचा निनाद घुमू लागतो. "ज्ञानोबा-तुकाराम"च्या जयघोषात
॥ श्री गणेशाय नमः ॥ ॥ श्री सरस्वत्यै नमः ॥ ॥ श्री गुरुभ्यो नमः ॥ ॥ श्री विठ्ठलाय नमः ॥ जय जय रामकृष्ण हरी! 🙏 आषाढ महिना सुरू झाला की संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळेच चैतन्य संचारते. गावोगावी टाळ-मृदंगांचा निनाद घुमू लागतो. "ज्ञानोबा-तुकाराम"च्या जयघोषात लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघतात. अनेकांना वाटते, आषाढी एकादशीला विठ्ठलाचे दर्शन झाले की वारी संपली. पण खरे पाहता, त्या दिवसापासूनच पंढरपूरमध्ये भक्तीचा अद्भुत सोहळा अधिक तेजाने खुलत जातो. आषाढ महिन्याच्या प्रारंभी श्री विठ्ठलाच्या मंदिरात एक विशेष विधी केला जातो. त्याला "पलंग काढणे" असे म्हणतात. त्या दिवसापासून विठ्ठलाची शेजारती, निद्रा आणि काही नियमित सेवा थांबविल्या जातात. कारण लाखो भक्त दर्शनासाठी येणार असतात. जणू काही विठ्ठल स्वतः म्हणत असतो—"माझे भक्त जागे आहेत, मग मी कसा निजू?" भक्तांच्या दर्शनासाठी स्वतःचा विश्रांतीचा त्याग करणारा हा देव म्हणजेच पंढरीचा विठुराया. षष्ठीपासून विविध संतांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने येऊ लागतात. नवमीला सर्व प्रमुख पालख्या वाखरी येथे मुक्काम करतात. तेथे माऊलींचे रिंगण भरते. अश्वांचा वेग, टाळांचा नाद, अभंगांचे सूर आणि वारकऱ्यांच्या डोळ्यातील भक्तिभाव—हे दृश्य पाहताना मन भारावून जाते. दशमीच्या दिवशी एक अत्यंत हृदयस्पर्शी परंपरा घडते. संत नामदेव महाराजांची पालखी स्वतः इतर संतांच्या स्वागतासाठी वाखरीपर्यंत जाते. वारकरी परंपरेत नामदेवरायांना विठ्ठलाचे प्रतिनिधी मानले जाते. म्हणून भक्त म्हणतात—"नामदेव आले म्हणजे विठ्ठलच स्वागताला आला." त्यानंतर ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, निवृत्तिनाथ, सोपानदेव आणि मुक्ताबाई यांच्या पालख्या मोठ्या उत्साहात पंढरपूरमध्ये प्रवेश करतात. आषाढी एकादशी हा वारीचा मुख्य दिवस. पहाटेपासून चंद्रभागेच्या तीरावर स्नानासाठी भक्तांची गर्दी उसळते. श्री विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा होते. त्यानंतर संतांच्या पालख्या नगरप्रदक्षिणेसाठी निघतात. चंद्रभागेत पादुकांना स्नान घातले जाते. महाद्वारासमोर अभंगांचा गजर होतो. "झळझळीत सोनसळा, दिसतो कळस सोज्वळा…" हा अभंग गाताना अनेक वारकऱ्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटून येतात. एकादशीची रात्र म्हणजे अखंड नामसंकीर्तनाची रात्र. प्रत्येक फडावर कीर्तन, अभंग आणि जागर चालतो. वारकरी उपवास करून विठ्ठलनामात रात्र जागवतात. दुसऱ्या दिवशी द्वादशीला "बारस सोडणे" होते. त्यानंतर खिरापतीचे कीर्तन आणि प्रसादाचा सोहळा पार पडतो. पूर्णिमेला सर्व संतांच्या पालख्या गोपाळपूर येथे जातात. तेथे "काला" होतो. हा केवळ प्रसादाचा कार्यक्रम नसून संपूर्ण वारीचा मंगल समारोप असतो. वारकरी एकमेकांना काला भरवतात आणि विठ्ठलनामात पुन्हा आपल्या गावाच्या दिशेने निघतात. अलीकडच्या काळात आणखी एक सुंदर परंपरा सुरू झाली आहे. सर्व संतांच्या पादुका श्री विठ्ठलाच्या मंदिरात नेऊन "देवभेट" घडवली जाते. जणू संत आपल्या विठुरायाला म्हणतात—"आम्ही तुझी लेकरं घेऊन आलो होतो; आता पुन्हा तुझ्या आज्ञेने सेवेसाठी निघतो." संत निळोबारायांचा विरहाने ओथंबलेला अभंग प्रत्येक वारकऱ्याच्या मनातील भावना व्यक्त करतो— > "पंढरीहूनि गावी जातां । वाटे खंती पंढरीनाथा ।। आता बोळवीत यावे । आमुच्या गावा आम्हासवे ।।" वारी म्हणजे केवळ पायी चालणे नव्हे. ती अहंकाराचा त्याग आहे. ती समतेचा उत्सव आहे. ती नामस्मरणाची अखंड साधना आहे. ती शिकवते की श्रीमंती वस्तूंमध्ये नसते, तर श्रद्धेत असते; प्रवास पायांनी नसतो, तर अंतःकरणाने असतो; आणि पंढरपूर हे फक्त एक तीर्थक्षेत्र नसून प्रत्येक भक्ताच्या हृदयातील वैकुंठ आहे. वारी दरवर्षी पंढरपूरला जाते; पण खरी वारी ती, जी आपल्या मनाला विठ्ठलाच्या चरणी नेते. पायांनी केलेली वारी काही दिवसांची असते, पण अंतःकरणात सुरू झालेली वारी आयुष्यभर चालते.
-संकलित
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment