जाणून घेऊया भारतीय भोजन परंपरेमागचे विज्ञान!
पाऊस म्हणजे भारतीय परंपरेचा खाद्य-योग! पावसाळा हा केवळ ऋतू नसून, निसर्गाचे स्थित्यंतर अनुभवण्याचा काळ आहे. अशा ऋतूत "तळणे, भाजणे आणि उकडणे..." या अन्नावरील तीन संस्कारांचे काय प्रयोजन असेल? आयुर्वेदिक तत्वज्ञान, शरीराची गरज आणि चविष्ट आनंदाचा मंत्र! पण असे खाणे कितपत सुरक्षित आहे? असे खाणे म्हणजे नेमके काय खाणे?
आषाढ - म्हणजे पावसाचा श्रीगणेशा. आतून कोरडेपणा व बाहेरून गारवा अशा विचित्र परिस्थितीत सापडल्याने शरीर सर्वत्र आखडते. परिणामी सांधेदुखी, गुडघेदुखी, सर्दी-खोकला, थंडीताप, इन्फेक्शन्स अशा वाताच्या समस्या वाढतात. जमिनीखालची उष्णता व पहिला मुसळधार पाऊस, यामुळे एकाच वेळी पित्त वाढते अन् वात सर्वत्र अडकून बसतो. या दोन्हींना बॅलन्स करायचे असेल तर आषाढात "तळलेले" खाणे हा अफलातून उपाय आहे! विशेषतः कोलेस्टेरॉल जराही वाढू न देता, तळलेले व गरम पदार्थ शरीराला आतून गरम व बाहेरून नरम ठेवण्याचे काम अचूकपणे करतात. तळलेले अन्न हेच त्यावेळी "औषध" बनते. आणि हे केवळ आषाढ महिन्यातच घडते! म्हणूनच, मे महिन्यात आपल्याकडे घरात पापड, कुरड्या, चकल्या, शेव, तिखट मिठाच्या पुऱ्या इ. आधीच बनवून ठेवायची पद्धत आहे, जेणेकरून पहिल्या पावसात हे पदार्थ तळून खाता येतील आणि पावसाचे आजार टाळता येतील.
शिवाय, कढईतून बाहेर पडणारी कुरकुरीत कांदाभजी... आणि कपातला उबदार चहा... यासारखा अंतर्बाह्य "आषाढ डायट" जगात शोधूनही सापडणार नाही!
श्रावण - म्हणजे सणांचा महिना. जमिनीतली उष्णता संपून चकाकी ऊन पडू लागते. ऊन-पावसाच्या खेळातून गारवा कमी होतो, मात्र दमटपणा वाढतो. वात हळूहळू कमी होऊन शरीरावयांचे आखडणे, दुखणे इ. तुलनेने कमी होते. मात्र पित्त वाढलेलेच असते. अशा वेळी वाताचा फार विचार न करता, केवळ पित्त आटोक्यात ठेवणे महत्त्वाचे, म्हणून श्रावणात "भाजलेले" खाणे सर्वोत्तम आहे. चुलीत किंवा कढईत भाजलेल्या भुईमुगाच्या शेंगा, मका, वाटाणा, वांग्याचे सुगंधी भरीत, भाजलेली ज्वारीची भाकरी, भाजलेले पापड, तांदूळ भाजून केलेला भात, भाजलेले लाडू इ. सर्व पित्ताचा राग थोपवतात. परिणामी ॲसिडिटी, मायग्रेन, हाय-बीपी, मुळव्याध ह्या तक्रारींचा जन्म होत नाही. आणि हो, भाजलेले खाण्याचा जो स्वर्गानुभव श्रावणात येतो, तो अख्ख्या वर्षभरात कधीच येत नाही. कदाचित म्हणूनच आपल्याकडे "श्रावणमासी हर्ष मानसी..." असे म्हटले आहे.
३) भाद्रपद - म्हणजे परतीचा पाऊस आणि तीव्र उकाड्याचे आगमन. गारव्याचा लवलेश संपल्याने वात बऱ्यापैकी शांत होतो. मात्र उकाड्यामुळे श्रावणात आधीच वाढलेले पित्त, शरीरात जिथे संधी मिळेल तिथे उद्रेक उत्पन्न करते (म्हणजेच पित्ताचा प्रकोप होतो). हाच तो काळ आहे जिथे जरा चुकीचे खाल्ले की हार्ट अटॅक, पॅरालिसिस, तीव्र ताप, कोणताही शुल्लक आजार अचानक गंभीर होणे इ. गोष्टी घडू लागतात. परिणामी सर्वाधिक वार्षिक मृत्यू ह्याच महिन्यात होताना दिसतात. अशा अनुचित घटना टाळण्यासाठी भाद्रपद महिन्यात बहुतांश धार्मिक उपवास आलेले आहेत, जेणेकरून अन्न कमी खाल्ले जाईल आणि पित्त प्रकोप व्हायला वाव मिळणार नाही. याचसाठी भाद्रपदात "उकडलेले" खाणे अगदी योग्य आहे.
जसे की, उकडलेल्या शेंगा, कंदमुळे, शेंगदाणे, उकडीचे मोदक, उकडून शिजवलेल्या पालेभाज्या, उकडलेला भात इ. प्रयत्नपूर्वक खाल्ल्याने October HEAT चे रूपांतर आपण October HIT मध्ये नक्की करू शकतो.
कदाचित म्हणूनच गणपती, गौरी, दुर्गा या देवता आपल्याला भेटण्यासाठी मुद्दाम भाद्रपदाचाच आसमंत निवडतात. कारण उकडलेले अन्न म्हणजे शरीराला दिलेला शुद्धता व शांतीचा स्पर्शच! नाही का?
अशा या अन्नाच्या निव्वळ तीन संस्कारांतून आपले आरोग्य अगदी मस्त ठेवण्याचा मार्ग आपल्या पारंपारिक भोजनामध्ये आहे, नाही का? आपले विज्ञान सांगते की, उत्तम आरोग्यामुळे उत्तम मन आणि स्थिर बुद्धी मिळते. अशा शांत मनाने देवाची आराधना नक्कीच आपल्याला समाधान देते. म्हणूनच व्रत-वै낙्यांच्या या चातुर्मासात आपले बहुतांश पारंपारिक सण-उत्सव साजरे होतात. तेव्हा आता यापुढे कोणत्या महिन्यात आपण काय खातोय ते काळजीपूर्वक तपासा. कारण आपले आरोग्य आपल्याच हातात आहे! - संकलित
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment