संघाचे पश्चिम क्षेत्र कार्यवाह बाळासाहेब चौधरी यांचे प्रतिपादन
जळगाव : 'आज बरेच ठिकाणी लव्ह जिहाद, लँड जिहाद अशा अनेक प्रकारांनी आपल्यावर आक्रमण होत आहे. त्यापासून समाजाला सावध व सक्षम करण्याचे काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक करत आहेत. संघाला समतायुक्त, शोषणमुक्त, समरस हिंदू समाज घडवायचा आहे,' असे प्रतिपादन संघाचे पश्चिम क्षेत्र (महाराष्ट्र, गुजरात, गोवा) कार्यवाह बाळासाहेब चौधरी यांनी केले. जळगाव शहरात झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 'कार्यकर्ता विकास वर्ग-१'चा समारोप कार्यक्रम ३० मे २०२६ रोजी सायंकाळी मूळजी जेठा (एमजे कॉलेज) महाविद्यालयाच्या एकलव्य क्रीडा संकुल मैदानावर झाला. त्या वेळी ते बोलत होते.
एकवीस दिवसांच्या वर्गात प्रशिक्षणार्थी स्वयंसेवकांनी नियुद्ध, दंड प्रहार, सामूहिक समता, योग प्रात्यक्षिके सादर केली. कार्यकमाची सुरुवात संजय तलखेडकर यांच्या प्रास्ताविकाने झाली. या वेळी मंचावर जळगाव शहर संघ संचालक उज्ज्वल चौधरी, जळगाव जिल्हा संघचालक डॉ. नीलेश पाटील, सनशाइन अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेडचे कार्यकारी संचालक आणि कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राजेश चौधरी, संघाचे पश्चिम क्षेत्र (महाराष्ट्र, गुजरात, गोवा) कार्यवाह बाळासाहेब चौधरी उपस्थित होते.
वर्गात २५५ प्रशिक्षणार्थी होते. त्यात डॉक्टर, वकील, शिक्षक, प्राध्यापक, कामगार, महाविद्यालयीन तरुण इत्यादींचा समावेश होता. त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी ३३ संघशिक्षक, ७५ कार्यकर्ते होते. रोज सकाळी ४.३० ते रात्री १० वाजेपर्यंत संघवर्ग सुरू असे. यामध्ये बौद्धिक माहिती, शारीरिक प्रशिक्षण, गीतगायन, योग, शारीरिक प्रशिक्षण आदींचा समावेश होता. प्रमुख पाहुणे राजेश चौधरी यांनी सांगितले, की 'संघ चरित्रनिर्माणाचे काम करतो. स्वयंसेवक भारतमातेची साधना करतात. संघ फक्त एक संस्था नाही, तर एक विचार आहे.'
प्रमुख वक्ते बाळासाहेब चौधरी यांनी सांगितले, 'संघाला १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. आज संघाचे नाव सर्वांना माहिती झाले आहे. संघाची विशेष कार्यपद्धती आहे. आपण सर्व एकजूट नसल्यामुळे आपल्यावर १५०० वर्षे परकीयांनी राज्य केले. त्यामुळे आपण एकजूट राहण्यासाठी डॉ. हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. आज सर्व समाज एकजूट होत आहे. हा देश एक हिंदू राष्ट्र आहे. आज सर्वसामान्य व्यक्ती व नेतासुद्धा म्हणतो, की गर्व से कहो हम हिंदू है.'
कार्यक्रमाच्या समारोपानंतर भोजनव्यवस्था करण्यात आली होती. सुमारे चार हजार नागरिक या समारंभसाठी उपस्थित होते. यासाठी पोळ्या संकलित करण्यात आल्या होत्या. कार्यक्रमात महिलांचा सक्रिय सहभाग होता. या समारोप कार्यक्रमाला शहरातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, युवक, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सहकुटुंब व सहपरिवार मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment