सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेऊन ठिबक सिंचन प्रणालीचा केला प्रभावी वापर
जालना : राज्य शासनाची मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत लाभदायक ठरत आहे. जालना जिल्ह्याच्या मंठा तालुक्यातील प्रगतिशील शेतकरी भास्कर जोशी यांनी या योजनेचा लाभ घेऊन आपल्या शेतीत उल्लेखनीय परिवर्तन घडवून आणले आहे. त्यांच्या शेतातील विहिरीवर बसवण्यात आलेल्या साडेसात एचपी क्षमतेच्या सौर कृषी पंपामुळे सिंचनाची समस्या दूर झाली असून, पिकांना वेळेवर पाणी उपलब्ध होत असल्याने उत्पादनात वाढ होत आहे.
भास्कर जोशी यांनी सांगितले, की पूर्वी अनियमित वीजपुरवठ्यामुळे शेतीचे नियोजन करणे कठीण होत होते. अनेकदा पाण्याअभावी पिकांचे नुकसान सहन करावे लागत होते. मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी ऑनलाइन अर्ज केला. शासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना सौर कृषी पंप मंजूर झाला आणि सिंचनासाठी विश्वासार्ह पर्याय उपलब्ध झाला.
सध्या त्यांच्या शेतात ऊस, मोसंबी, लिंबू आणि हळद यांसारख्या विविध पिकांची लागवड करण्यात येत आहे. पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी त्यांनी ठिबक सिंचन प्रणालीचा अवलंब केला असून, सौर कृषी पंपामुळे या व्यवस्थेला अधिक बळ मिळाले आहे. त्यामुळे पाण्याची बचत होण्यासह पिकांना नियमित पाणीपुरवठा करणे शक्य झाले आहे.
दरम्यान, महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) संस्थेचे जालना जिल्हा व्यवस्थापक नितीन खेकाळे यांनी भास्कर जोशी यांच्या शेताला भेट देऊन शेतीची पाहणी केली. यावेळी त्यांनी सौर कृषी पंप, ठिबक सिंचन व्यवस्था तसेच विविध पिकांच्या लागवडीची माहिती घेतली. भास्कर जोशी यांनी शासनाच्या योजनेचा प्रभावी वापर करून साधलेली प्रगती कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.
या वेळी नितीन खेकाळे यांनी कृषी क्षेत्रातील विविध शासकीय योजना, आधुनिक तंत्रज्ञान आणि शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असलेल्या संधींबाबत मार्गदर्शन केले. शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ घेऊन आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यास शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना ही शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासोबतच शेतीसाठी शाश्वत ऊर्जास्रोत उपलब्ध करून देणारी महत्त्वपूर्ण योजना ठरत आहे. भास्कर जोशी यांची यशोगाथा ही शासनाच्या योजनांचा प्रभावी वापर करून शेतीत सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याचे प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment