बोधकथा - ४९
एक लाकूडतोड्या जंगलात लाकडे तोडण्यासाठी जात असे. एके दिवशी जंगलात त्याला एक साधू भेटला. त्या साधूने त्याला सांगितले, 'पुढे जात राहा.'
घरी परतल्यानंतर लाकूडतोड्या विचार करू लागला, 'या साधूने मला पुढे जात राहा असे का सांगितले असेल?' काही दिवस गेले. एके दिवशी त्याला त्या शब्दांची आठवण झाली. त्याने ठरवले, 'आज मी जंगलात आणखी आतपर्यंत जाईन.' तो जंगलाच्या अधिक घनदाट भागात गेला. तेथे त्याला चंदनाची असंख्य झाडे दिसली. तो आनंदित झाला. त्याने चंदनाची लाकडे आणली, बाजारात विकली आणि भरपूर पैसा कमावला.
काही दिवसांनी त्याला पुन्हा त्या साधूचे शब्द आठवले. तो या वेळी आणखी पुढे गेला. नदीकाठी त्याला चांदीची खाण सापडली. हे तर त्याच्या कल्पनेपलीकडचे होते. त्याने चांदी काढून विकली आणि प्रचंड श्रीमंत झाला. काही दिवसांनी तो पुन्हा विचार करू लागला, 'साधूने मला पुढे जात राहा असेच सांगितले होते.'
या वेळी तो नदीच्या पलीकडे गेला. तिथे त्याला सोन्याची खाण सापडली. तो आनंदाने उद्गारला, 'अरे वा! त्यांनी मला पुढे जात राहा असे सांगण्यामागचे कारण हेच होते!'
तो तिथेही थांबला नाही. आणखी काही दिवसांनी तो जंगलाच्या अधिक घनदाट भागात गेला. तिथे त्याला हिऱ्यांचे आणि इतर मौल्यवान रत्नांचे ढीग सापडले. साहजिकच तो कुबेरासारखा धनवान बनला.
बोध : जीवनात एखादे यश मिळाले, की अनेक जण तिथेच थांबतात. थोडी प्रगती झाली, थोडे ज्ञान मिळाले किंवा थोडा आनंद अनुभवला की आपले ध्येय पूर्ण झाले असे त्यांना वाटते; पण खरे यश सतत पुढे जाणाऱ्यांनाच मिळते. लाकूडतोड्याने चंदनाच्या लाकडांवर समाधान मानले असते, तर त्याला चांदी, सोने आणि हिरे कधीच सापडले नसते. प्रत्येक टप्प्यावर त्याने आणखी पुढे जाण्याचा धीर दाखवला आणि त्यामुळे त्याला अधिक मौल्यवान गोष्टी मिळत गेल्या. सतत प्रयत्न, चिकाटी आणि प्रगतीची वृत्ती ठेवली तरच जीवनातील सर्वोच्च ध्येय गाठता येते. लहान यशावर समाधान मानू नका. सतत शिकत राहा, प्रयत्न करत राहा आणि पुढे जात राहा. कारण पुढच्या प्रत्येक पावलामागे अधिक मोठी संधी दडलेली असते.
(स्वामी रामकृष्ण परमहंस यांनी आपल्या शिष्यांना सांगितलेल्या कथेवर आधारित...)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment