युवा ब्राह्मण संघ व सावरकर विचार मंचातर्फे आयोजन
यवतमाळ : युवा ब्राह्मण संघ आणि सावरकर विचार मंच यांच्या वतीने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यवतमाळमधील हनुमान आखाडा चौकात सावरकरांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून नगरसेविका मनीषा भावे, मेरा युवा भारत संस्थेचे अनिल ढेंगे, तसेच प्रमुख वक्त्या म्हणून प्रा. ललिता घोडे उपस्थित होत्या. या वेळी मान्यवरांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनकार्याचा, राष्ट्रभक्तीचा, सामाजिक सुधारणांचा आणि क्रांतिकारी विचारांचा आढावा घेऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले.
प्रा. ललिता घोडे यांनी आपल्या भाषणात सावरकरांच्या राष्ट्रनिर्माणातील योगदानावर प्रकाश टाकून त्यांच्या विचारांचे आजच्या तरुण पिढीसाठी असलेले महत्त्व अधोरेखित केले. युवकांनी सावरकरांचे विचार आत्मसात करून राष्ट्रहितासाठी कार्य करण्याचे आवाहन मान्यवरांनी केले.
या वेळी उपस्थित मान्यवरांनी हनुमान आखाडा चौकाचे ऐतिहासिक महत्त्वही अधोरेखित केले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा यवतमाळशी असलेला संबंध सांगताना हनुमान आखाडा चौकातील हनुमान मंदिर परिसरात सावरकरांनी आपल्या वास्तव्यात अनेक बैठका घेतल्याची ऐतिहासिक नोंद असल्याचे नमूद करण्यात आले. त्यामुळे या ठिकाणी सावरकर जयंती साजरी करण्यास विशेष ऐतिहासिक महत्त्व होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राम साकळे यांनी केले, तर आभारप्रदर्शन अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक परीक्षित शर्मा यांनी केले.
सावरकरांचे राष्ट्रभक्तिपर विचार तरुणांपर्यंत पोहोचवणे व राष्ट्रीय चेतना जागृत करणे हा या कार्यक्रमामागील मुख्य उद्देश होता. कार्यक्रमाला युवा ब्राह्मण संघ व स्वातंत्र्यवीर सावरकर विचार मंचाचे पदाधिकारी, सदस्य, तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment