७० वर्षांहून अधिक वयाच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना घेता येतो लाभ
देशातील ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी केंद्र सरकारने आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा विस्तार करून व्याप्ती वाढवली. ७० वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या सर्व नागरिकांसाठी आयुष्मान वय वंदना योजना सुरू असल्याने देशातील सुमारे सहा कोटी ज्येष्ठ नागरिकांच्या कुटुंबांना दर वर्षी पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचारांची सुविधा उपलब्ध होते.
ही योजना ७० वर्षांहून अधिक वयाच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी लागू असून, यासाठी कौटुंबिक उत्पन्नाची किंवा आर्थिक स्थितीची कोणतीही अट नाही. कुटुंबाकडे आधीच आयुष्मान कार्ड असेल, तर कुटुंबातील ७० वर्षांवरील ज्येष्ठ व्यक्तीला या अंतर्गत ५ लाख रुपयांचे स्वतंत्र आणि अतिरिक्त टॉपअप कव्हर दिले जाते.
या योजनेची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल असून अर्जदाराचे वय ७० वर्षे पूर्ण असल्याची खात्री करण्यासाठी फक्त आधार कार्ड आवश्यक आहे. आधार कार्डशी मोबाइल नंबर लिंक असणे अनिवार्य आहे. कारण संपूर्ण पडताळणी ओटीपीद्वारे केली जाते. नागरिकांना हे घरबसल्याही करता येते. यासाठी प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवरून केंद्र सरकारचे अधिकृत आयुष्मान ॲप डाउनलोड करावे लागते. तिथे बेनिफिशियरी हा पर्याय निवडून मोबाइल नंबर आणि आलेल्या ओटीपीद्वारे लॉगिन करावे. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकाचा आधार कार्ड नंबर देऊन ई-केवायसी पर्याय निवडावा आणि आधार लिंक मोबाइलवर येणारा ओटीपी देऊन पडताळणी पूर्ण करावी. शेवटी ज्येष्ठ नागरिकाचा लाइव्ह फोटो मोबाइल कॅमेऱ्याने क्लिक करून अपलोड केल्यानंतर काही वेळातच विशिष्ट आयुष्मान वय वंदना कार्ड तयार होते. ते मोबाइलवर डाउनलोड करता येते. ही प्रक्रिया संपूर्णपणे ओटीपीवर आधारित असल्याने बाहेरून काम करून घेताना गोपनीय कागदपत्रांचा किंवा ओटीपीचा गैरवापर होणार नाही याची काळजी घ्यावी. सामाजिक उपक्रमांतर्गत घरपोच कार्ड मिळवण्यासाठी केवळ नाममात्र शुल्क आकारले जाते. त्यामुळे अधिक माहितीसाठी अधिकृत शासकीय केंद्रांशी संपर्क साधावा.
संकेतस्थळ :https://beneficiary.nha.gov.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment