अमृत परिवार सर्वेक्षण म्हणजे लक्ष्यित गटाच्या हितासाठी अमृत संस्थेचे विशेष पाऊल
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे एप्रिल महिन्यात अमृत परिवार सर्वेक्षण करण्यात आले. अमृत ही संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. संस्थेच्या योजना लक्ष्यित गटातील जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचाव्यात, त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात, याकरिता हे सर्वेक्षण करण्यात आले होते. अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वेक्षणावेळी आलेले अनुभव....
अहिल्यानगरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक सुरेशनाना जाधव यांच्या हस्ते आठ एप्रिलला अमृत परिवार सर्वेक्षणाचा प्रारंभ करण्यात आला. अमृत संस्थेच्या योजना लक्ष्यित गटापर्यंत पोहोचवणे, त्यांच्या अडचणी जाणून घेणे, लक्ष्यित गटासाठी शासनाच्या योजना आहेत हे माहिती व्हावे आणि त्या योजनांचा लाभ कसा त्यांना मिळेल, याकरिता हे सर्वेक्षण करण्यात आले होते. अनेक गावांमध्ये लक्ष्यित गट नाही किंवा काही ठिकाणी अगदी एक-दोन कुटुंबेच आहेत, त्यांनाही सहकार्यासाठी अमृत संस्था आहे याची जाणीव होणेही महत्त्वाचे होते.
अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अमृत टीमच्या माध्यमातून २२ दिवसांमध्ये एकूण २५३ गावांना भेटी देण्यात आल्या. त्यातील २२८ गावांतील ग्रामपंचायत/तलाठी कार्यालयात अमृतच्या योजनांचे स्टिकर्स लावण्यात आले. या कालावधीत एकूण ७३५ परिवारांचे सर्वेक्षण करण्यात आले.
अमृत परिवार सर्वेक्षणासाठी प्रवास करताना अनेक कुटुंबांशी प्रत्यक्ष संवाद साधण्यात आला. लक्ष्यित गटातील कुटुंबांना भेटताना त्यांच्या अडचणी, अपेक्षा, त्यांची परिस्थिती जाणून घेणे, त्यांना योजनांची माहिती देणे, हे गरजेचे होते याची प्रखरतेने जाणीव झाली. अमृत परिवार सर्वेक्षण करताना विविध संघटनांचे पदाधिकारी, गावांचे सरपंच, सदस्य व पदाधिकारी, तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक यांची भेट झाली. अमृत संस्थेच्या कार्याबद्दल त्यांना अधिक प्रभावीपणे माहिती देता आली.
सर्वेक्षणाच्या माध्यमातून केवळ माहिती संकलन न करता त्यांच्यासाठी अधिक प्रभावीपणे योजनांव्यतिरिक्तही काय कार्य करता येईल याची जाणीव झाली. आजच्या काळात गुरुकुल शिक्षण पद्धती, अभ्यास केंद्र आणि अमृत वर्ग, संस्कार केंद्र यांची किती गरज आहे याचीही प्रखरतेने जाणीव झाली. ग्रामीण भागात शेतकऱ्यांना त्यांच्यासाठीही योजना आहेत आणि त्यांनाही लाभ घेता येईल, हे कळल्यावर आनंद झाला. अमृत परिवार सर्वेक्षण फक्त काही दिवसांपुरते मर्यादित न ठेवता नियमितपणे चालू ठेवण्याचा अहिल्यानगर टीमचा मानस आहे.
सागर भोपे
अहिल्यानगर जिल्हा व्यवस्थापक, अमृत
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment