रायगड जिल्ह्यातील एक महत्त्वाचे पर्यटनस्थळ
कुलाबा किल्ला किंवा किल्ला-इ-कुलाबा (किल्ले कुलाबा) मुंबई शहरापासून ९५ किलोमीटर दक्षिणेला रायगड जिल्ह्यात अलिबागजवळ आहे. हा जलदुर्ग समुद्राच्या किनाऱ्यालगतच; पण किनाऱ्यापासून २ किलोमीटर अंतरावर अरबी समुद्रात आहे. हा किल्ला समुद्रसपाटीला आहे. अलिबाग किनाऱ्यावरून १५ मिनिटे चालत किंवा घोडागाडी करून जाता येते. संपूर्ण किल्ला दोन तासांत आरामात फिरून होतो.
तीस ते पस्तीस किलोमीटर लांबीची अलिबाग तालुक्यातील किनारपट्टी अष्टागर या नावाने ओळखली जाते. या अष्टागराचा राजा म्हणजे किल्ले कुलाबा अर्थात अलिबागचा पाणकोट. शिवरायांनी जे जुने किल्ले दुरुस्त करून मजबूत केले त्यापैकी एक किल्ले कुलाबा! प्रथम शिवशाहीनंतर पेशवाई आणि सरतेशेवटी इंग्रज असे कालखंड किल्ले कुलाब्याने पाहिले. इंग्रज ज्यांना ‘समुद्रावरील शिवाजी’ असे संबोधत, त्या कान्होजी आंग्रे यांच्या पहिल्या सागरी राजधानीचा मान किल्ले कुलाब्याला मिळाला.
किल्ल्याच्या बांधकामाचे काम १९ मार्च १६८० रोजी सुरू झाले. कुलाबा हा शिवाजी महाराजांनी जिंकलेला किल्ला आहे. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर १६८१मध्ये संभाजीराजांनी किल्ल्याचे बांधकाम पूर्ण केले. १७१३मध्ये पेशवे बाळाजी विश्वनाथ, कुलाबा यांच्यासह एक करारानुसार कान्होजी आंग्रे यांना अनेक किल्ले देण्यात आले. त्यांनी ब्रिटिश जहाजांवर छापे घालण्यासाठी ते मुख्य आधार म्हणून वापरले. चार जुलै १७२९ रोजी कुलाबा किल्ल्यावर कान्होजी आंग्रेंचा मृत्यू झाला. पिंजरा बुरुजाजवळ लागलेल्या आगीच्या घटनेमुळे १७९०मध्ये बऱ्याच इमारतींचा नाश झाला.
आता अनेक पर्यटक अलिबाग समुद्रकिनारी आल्यानंतर कुलाबा किल्ल्यामध्ये ओहोटीच्या वेळेला पायी जातात किंवा भरतीच्या वेळेला बोटीने आनंद घेत जातात. ज्येष्ठ नागरिकांसाठी किंवा आनंद घेण्यासाठी घोडा गाड्या सुद्धा तिथे उपलब्ध असतात. किल्ल्यामध्ये गोड्या पाण्याची विहीर आहे. उजव्या सोंडेचे गणपती पंचायतन आहे, त्याच्यासमोर पुष्करिणी आहे. माघी चतुर्थीला गणपती जन्मोत्सव तेथे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. किल्ल्याच्या परिसरात हनुमानाचे मंदिर, शंकराचे मंदिर, इतिहासकालीन तोफा, दारूगोळा ठेवण्याचे ठिकाण आहे.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment