जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिनानिमित्त (२३ एप्रिल) विवेचन...
जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन दर वर्षी २३ एप्रिल रोजी साजरा केला जातो. वाचन, प्रकाशन आणि कॉपीराइट संरक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी जगभरात साजरा केला जाणारा हा वार्षिक कार्यक्रम आहे. हा दिवस महत्त्वाचा आहे. कारण या दिवसाने पुस्तकांचे आपल्या आयुष्यातील महत्त्व अधोरेखित होते. पुस्तके आणि वाचनाचे महत्त्व ओळखण्यासाठी युनेस्कोने हा दिवस निश्चित केला. जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन पहिल्यांदा १९९५मध्ये साजरा करण्यात आला. त्या वर्षी युनेस्कोने हा दिवस पुस्तके आणि वाचनाचा जागतिक उत्सव म्हणून निश्चित केला. १६१६ साली याच दिवशी विल्यम शेक्सपियर, मिगुएल डी सर्व्हेंटेस आणि इंका गार्सिलासो डे ला वेगा या महान लेखकांचे निधन झाले. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त २३ एप्रिल ही तारीख या दिवसासाठी निवडण्यात आली. हा दिवस लोकांना अधिक वाचन करण्यास प्रोत्साहित करतो. जगभरातील लाखो लोक दर वर्षी जागतिक पुस्तक दिन अतिशय उत्साहाने साजरा करतात. १००हून अधिक देशांमध्ये या दिनानिमित्त शाळा, ग्रंथालये आणि इतर संस्थांमध्ये कार्यक्रम आणि उपक्रम आयोजित केले जातात.
पुस्तकांचे आपल्या जीवनात काय महत्त्व आहे? एखाद्या रोपट्याला वाढीसाठी पाणी, सूर्यप्रकाश आणि सकस माती यांची आवश्यकता असते. त्या झाडाला पुरेपूर पाणी दिले, हवा तेवढा सूर्यप्रकाश मिळाला, तरी जर माती सकस नसेल तर झाडाची वाढ खुंटेल. आपल्या आयुष्यातून पुस्तके नाहीशी झाली, तर तीच अवस्था आपली होईल. आपल्या मेंदूला, त्यात उत्पन्न होणाऱ्या सगळ्या विचारांना एक भक्कम आधार देण्याचे, योग्य दिशा देण्याचे काम पुस्तके करत असतात. माती झाडाच्या मुळांना घट्ट धरून तर ठेवतेच; पण त्याचबरोबर झाडाला सर्व पोषक घटकांचा पुरवठापण करते. तसेच आपल्या विचारांना पुस्तके एक बैठक तर देतातच; पण योग्य आणि सकारात्मक विचारांनी आपले व्यक्तिमत्त्वही घडवतात. सगळ्या थोर आणि यशस्वी व्यक्तींचे आयुष्य घडविण्यासाठी कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर पुस्तकेच माध्यम ठरलेली असतात.
असे काय असते पुस्तकात, जे आपले आयुष्य बदलवून टाकते? पुस्तके आपले व्यक्तिमत्त्व घडवण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. ती आपल्या विचारांना नवी दिशा देतात. वाचनामुळे ज्ञानाचा साठा वाढतो आणि समज अधिक सखोल होते. पुस्तके आपल्याला योग्य-अयोग्य यातील फरक समजावून देतात. त्यातून आपल्यावर चांगले संस्कार होतात. विविध व्यक्तींच्या जीवनकथा वाचून प्रेरणा मिळते. पुस्तके आपल्याला संयम आणि एकाग्रता शिकवतात. त्यामुळे विचारशक्ती आणि कल्पनाशक्ती विकसित होते. वाचनामुळे आत्मविश्वास वाढतो. भाषा अधिक समृद्ध आणि प्रभावी होते. पुस्तके आपल्याला जगाचा व्यापक दृष्टिकोन देतात. त्यातून सहानुभूती आणि संवेदनशीलता वाढते. अडचणींना सामोरे जाण्याची ताकद मिळते. पुस्तके आपल्याला योग्य निर्णय घेण्यास मदत करतात. नवीन कल्पना आणि सर्जनशीलता यांना चालना मिळते. वाचनामुळे मन शांत आणि प्रसन्न राहते. चांगल्या सवयी आत्मसात करण्यास मदत होते. पुस्तके आपल्याला स्वावलंबी आणि विचारशील बनवतात. त्यामुळे जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होतो. अशा प्रकारे पुस्तके आपल्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास घडवतात.
पुस्तकांचे विविध विषय असतात आणि प्रत्येक विषयाची पुस्तके आपल्याला मार्ग दाखवतात. आत्मचरित्रे आणि चरित्रे आपल्याला महान व्यक्तींच्या संघर्षाची ओळख करून देतात. प्रेरणादायी पुस्तके आपल्यात नवी उमेद आणि जिद्द निर्माण करतात. आध्यात्मिक पुस्तके मनःशांती आणि आत्मचिंतनाची दिशा देतात. विज्ञान व तंत्रज्ञानावरील पुस्तके नवीन विचारांना चालना देतात. साहित्यकृती मनाला समृद्ध करून भावविश्व विस्तारतात. इतिहासाची पुस्तके भूतकाळातून शिकण्याची संधी देतात. व्यवसाय आणि अर्थशास्त्रावरील पुस्तके यशाचा मार्ग दाखवतात. स्व-विकासावरील पुस्तके आपल्या क्षमतांचा शोध घेण्यास मदत करतात. म्हणूनच 'एका पुस्तकाने विचार बदलतात आणि त्या एका विचाराने आयुष्य बदलते' हे शब्द अगदी सार्थ आहेत.
(संकलित)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment