सिल्लोड तालुक्यातील वडोदचाथा येथील शेतकऱ्याने व्यक्त केले समाधान
सिल्लोड (छत्रपती संभाजीनगर) : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवल्या जातात. त्यामुळे ग्रामीण भागातील नवउद्योजकांना मोठे प्रोत्साहन मिळत आहे. या योजनांच्या माध्यमातून अनेकांना व्यवसाय उभारण्यासाठी आर्थिक दिलासा मिळत असून, स्वावलंबनाचा मार्ग खुला होत आहे. सिल्लोड तालुक्यातील वडोदचाथा येथील उद्योजक सागर वसंतराव सोनटक्के यांना अमृत संस्थेच्या वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा योजनेचा लाभ मिळाला आहे. त्यांनी त्यांच्या दुग्ध व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जावर त्यांना ४९ हजार ७०० रुपयांचा व्याजपरतावा मिळाला असून, त्यांनी त्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
सागर सोनटक्के यांनी चिखली बँकेकडून आठ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज घेऊन गीर गायींची खरेदी केली व दुग्ध व्यवसायाला सुरुवात केली. सध्या ते सिल्लोड शहरात सकाळी व संध्याकाळी दुधाचे रतीब घालतात. त्यांच्याकडील शुद्ध आणि दर्जेदार दुधाची ते ८० रुपये प्रति लिटर दराने विक्री करतात. याशिवाय ते गीर गायीच्या दुधाचे शुद्ध तूप सुमारे अडीच हजार रुपये प्रति किलो दराने विकतात. त्यांच्याकडील दुग्धोत्पादनांना चांगली मागणी असून, उत्पन्नाचे नियमित साधन त्यांच्या व्यवसायातून निर्माण झाले आहे.
सोनटक्के यांच्या नावावर सुमारे साडेचार एकर शेती असून शेतीसोबत जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय सुरू केल्याने त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक स्थितीत सकारात्मक बदल झाला आहे. शेतीसोबत पूरक व्यवसाय केल्याने उत्पन्नाचे विविध स्रोत निर्माण होतात आणि ग्रामीण कुटुंबांना आर्थिक स्थैर्य मिळते, याचे उदाहरण त्यांच्या रूपाने पाहायला मिळत आहे.
अमृत संस्थेच्या योजनेअंतर्गत मिळालेला ४९ हजार ७०० रुपयांचा व्याजपरतावा त्यांच्या बचत खात्यात जमा झाला. या योजनेमुळे नवउद्योजकांना आर्थिक मदत मिळते आणि व्यवसाय उभा करण्यासाठी प्रोत्साहन मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
सागर सोनटक्के म्हणाले, 'मी चिखली बँकेकडून कर्ज घेऊन गीर गायी खरेदी केल्या आणि दुग्धव्यवसाय सुरू केला. अमृत संस्थेकडून माझ्या खात्यात ४९ हजार ७०० रुपयांचा व्याजपरतावा जमा झाला आहे. त्यामुळे मला मोठा दिलासा मिळाला आहे. अमृत संस्थेचे जिल्हा उपव्यवस्थापक योगेश रोडे यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे हा व्यवसाय मी उभारू शकलो.'
'अमृत संस्थेच्या योजनांचा लाभ लक्ष्यित गटातील अधिकाधिक लोकांनी घ्यावा,' असे आवाहनही त्यांनी केले. अमृत संस्थेतर्फे राबवण्यात येणाऱ्या योजनांमुळे ग्रामीण भागातील युवकांना उद्योग-व्यवसायाकडे वळण्यास प्रोत्साहन मिळत असून, त्यांना आत्मनिर्भरतेच्या मार्गावर चालणे सुलभ होत आहे.
अमृत संस्थेच्या विविध योजनांच्या माहितीसाठी संपर्क :
अक्षय चंद्रकांत लंबे - 7391065475
छत्रपती संभाजीनगर जिल्हा व्यवस्थापक, अमृत
योगेश भास्करराव रोडे - 9403200606
छत्रपती संभाजीनगर जिल्हा उपव्यवस्थापक, अमृत
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment