हत्तींना नियंत्रित करण्याच्या कलेत पारंगत असलेल्या पार्वती बारुआ म्हणजे एक अनोखे व्यक्तिमत्त्व आहे.
हत्तींना नियंत्रित करण्याच्या कलेत पारंगत असलेल्या पार्वती बारुआ म्हणजे एक अनोखे व्यक्तिमत्त्व आहे. त्या आसाममधील गौरीपूर राजघराण्यातील. हत्तींना नियंत्रित करण्याच्या कलेशी वयाच्या १४व्या वर्षी त्यांचा संबंध आला आणि गेल्या ५६ वर्षांत या शास्त्राशी आणि कलेशी प्रामाणिक राहून त्यांनी खूप मोठे आणि महत्त्वाचे काम केले आहे. त्यांचा अनोख्या कार्याचा हा अल्प परिचय...
पी. सी. बारुआ म्हणजे पार्वती यांचे वडील म्हणजे गौरीपूर या संस्थानाचे पूर्वीचे राजे. आसामच्या जंगलात ते ओळखले जात लालजी या टोपण नावाने. वर्षातील सहा ते नऊ महिने ते आणि त्यांचे कुटुंबीय जंगलात राहत असत. पार्वती ही त्यांच्या नऊ मुलांतील सर्वांत लाडकी. असे म्हणतात, की तिने डोळे उघडले तेच मुळात हत्ती पाहत. १९४७ साली देश स्वतंत्र झाला आणि स्वतंत्र भारताच्या सरकारने संस्थानिकांचे तनखे काढून घेतले, अधिकार रद्द केले. लालजी जंगलाच्या आश्रयाला गेले आणि त्यांच्याबरोबर पार्वतीही गेली. वडील-लेकीने मिळून अनेक जंगली हत्ती पकडले, त्यांना माणसाळवले आणि खासगीरीत्या व सोनेपूरच्या यात्रेत नेऊन विकले. १९७७मध्ये भारत सरकारने हत्ती पकडण्यावर आणि त्यांचा व्यापारी वापर करण्यावर बंदी घातली.
लालजी यांच्या निधनानंतर त्यांचे कार्य पार्वतीने पुढे नेले. हत्तींना माणसाळवून विकण्याऐवजी आता या हत्तींची देखभाल ती करायची आणि त्यांचे शिकारी व इतरांपासून रक्षण करण्याचे व्रत तिने स्वीकारले. भूतानच्या पायथ्याशी असलेल्या सुभासिनी टी इस्टेट परिसरात पार्वती बारुआ यांनी नदीकाठी एक फार्महाउस बांधले आहे. तिथे त्या राहतात. एस. एस. बिश्त हे या भागातील वनाधिकारी पार्वती यांना अनेक वर्षांपासून ओळखतात. ते म्हणतात, “पार्वतीच्या आवाजात काय जादू आहे समजत नाही. परंतु तिचा आवाज ऐकल्यानंतर हत्ती शांत होतात, ती सांगेल तसे वागतात.
हत्ती व्यवस्थापन हीदेखील एक कला आहे. त्याचेही अभ्यासाने, अनुभवाने बनवलेले तंत्र आहे. जे काही करायचे ते एकदाच, बिनचूक राहून... तरच हत्ती माणसाळतात. पार्वती यांना बिहार, पश्चिम बंगाल, आसाममधून हत्ती पकडण्यासाठी, त्यांना माणसाळवण्यासाठी बोलावतात, त्यांचे व्यवस्थापन पाहण्यासाठी बोलावतात. आता वाढत्या वयामुळे त्यांना ही दगदग नको वाटते. परंतु त्यांच्यातील माहूत त्यांना स्वस्थ बसू देत नाही. दोरखंड, साखळ्या, खुकरी ही त्यांची मोहिमेवर निघतानाची प्रमुख साधने.
हत्ती मोहिमेवर निघण्यापूर्वी त्या कालीमाता, गणपती, सतशिकारी (वनदेवता) आणि मुस्लिम संत माहूत पीर याची पूजा करूनच बाहेर पडतात. गेली दोन दशके त्या एकाकीपणे हत्तींना वाचवण्यासाठी झटत आहेत. त्यांच्या मते एक माणूस हत्तीने मारला, तर फार चिंता करायचे कारण नाही. माणसांची संख्या मोठी आहे; पण एक हत्ती मारला गेला, तर आधीच कमी होत असलेली हत्तींची उरलीसुरली जमात नष्ट होण्याच्या मार्गावर उभी ठाकेल, हे विसरता येणार नाही. त्यांच्या या मोहिमेसाठी आणि हत्ती वाचवण्यासाठी केलेल्या कार्याबद्दल २०२४मध्ये त्यांना पद्मश्री सन्मानाने गौरवण्यात आले होते.
(संकलित)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment